
Mumbai News : नवी मुंबईतील खारघर येथे अप्पासाहेब धर्माधिकरी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यासाठी एप्रिलमध्ये आयोजिण्यात आलेल्या शासकीय सोहळ्याच्या नियोजशून्य आयोजनामुळे उष्माघात तसेच चेंगराचेंगरी होऊन निष्पाप १७ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
वीस लाख लोकांना भरउन्हात बोलावून महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा सोहळा आयोजित करणारा शहाणा कोण, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारची खरडपट्टी काढली. त्यालाच या वेळी झालेल्या चेंगंराचेंगरीबद्दल जबाबदार धरून त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्णाघाताने झालेल्या मृत्युंच्या संदर्भात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अजय चौधरी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ‘उष्णतेच्या लाटेचा पूर्व अंदाज हवामान खात्याने दिलेला असतानाही चुकीच्या वेळेला कार्यक्रम आयोजित केला. त्यात अनेकांचे जीव गेले. हा सरकारी कार्यक्रम होता त्यामुळे याची जबाबदारी सरकारचीच आहे.
त्यामुळे ज्या कंपनीला कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी दिली त्या कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची यावा. तसेच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्यात यावी,’ अशी मागणी अजय चौधरी यांनी या वेळी केली.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, कारण यासंदर्भात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली असल्याचे स्पष्ट केले. ‘सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासंदर्भात संविधानात ज्या तरतुदी आहेत यामध्ये हेतू हा मृत्यूच्या संदर्भात असला पाहिजे, असे नमूद केल्याचे सांगितले. विरोधक यावर राजकारण करीत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
यामध्ये ज्या कुटुंबातील व्यक्तींचे मृत्यू झाले त्यांच्याकडून कार्यक्रमाच्या व्यवस्थेबद्दल तक्रार नव्हती, असे उत्तर दिले. पण विरोधकांचे या उत्तराने समाधान न झाल्याने याचे उत्तर गृहखात्याने द्यावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या समितीला तीन महिन्यांची मुदतवाढ का दिली, असा सवाल करत जयंत पाटील यांनी, हा प्रश्न राखून ठेवत १५ दिवसांत अहवाल सादर करावा, अशी मागणी केली.
मात्र मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उत्तर रेटून नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जाऊन सरकारच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. तरीही मंत्री स्पष्ट उत्तर देत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.