
अनिल जाधव
पुणेः राज्याच्या अनेक भागात एक महिन्यापासून पाऊस नाही. कृषी आयुक्तालयानं सांगितलं की राज्यातील २३१ मंडळांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त आहे. मग, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आपण पीक विमा तर भरला. पण पावसात खंड पडल्यावरही विमा भरपाई मिळते का? मिळत असेल तर किती मिळू शकते? पीक विमा भरपाई काढण्याची नेमकी भानगड काय आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात आले असतीलच. नेमकं याच कळीचा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत.
पहिला प्रश्न म्हणजे, पाऊस कमी पडणं, म्हणजे किती कमी पडल्यावर हि प्रक्रिया सुरु होते ? तर पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिकचा खंड दिल्यास म्हणजेच पाऊसच आला नाही तर शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळते. या २१ दिवसांच्या काळात एका दिवसात २.४ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला नसावा. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत पीक विमा भरपाईची तरतूद आहे.
तुमच्या मंडळात जर पावसामध्ये सलग २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडला आणि पीक विमा समितीच्या सर्वेक्षणात उत्पादनात घट होणार असं लक्षात आलं, तर २५ टक्के अग्रीम भरपाईची मिळू शकते. पण यात जिल्हाधिकाऱ्यांची भुमिका खूप महत्वाची असते. जिल्हाधिकारी आपल्या मंडळात प्रथमदर्शनी उत्पादनात घट दिसत असल्यास तालूका पीक विमा समितीला नुकसान सर्वेक्षणाच्या सूचना देतील.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर तालुका पीक विमा समिती सर्वेक्षण करेल. त्यासाठी ८ दिवसांचा कालावधी असतो. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, विषय जाणकार आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असतो. शेतकरी म्हणून तुम्ही या समितीत सहभाग घेणं खूप महत्वाचं आहे. तालुका पीक विमा समितीने सर्वेक्षण करून उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी राहील, असा अहवाल दिला तर जिल्हाधिकारी तुमच्या मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम भरपाई देण्याची अधिसूचना काढू शकतात. पण विमा कंपन्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेवरून भरपाई देतीलच असं नाही. कंपन्या अग्रीम भरपाई नाकारूही शकतात. असं झाल्यास हा विषय सुनावणीसाठी वेगळ्या समितीकडे जातो.
मग राज्यातील किती मंडळांमध्ये पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडला, याची माहिती आम्ही जाणून घेतली. कृषी आयुक्तालयानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ५२८ मंडळांमध्ये पावसात १५ ते २१ दिवसांचा खंड आहे. यापैकी तब्बल २३१ मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा खंड पडला. म्हणजेच ही २३१ मंडळं अग्रीम भरपाईला पात्र ठरू शकतात. यात पुणे विभागातील सर्वाधिक मंडळांचा समावेश आहे. आपण आता कोणत्या विभागात कोणता जिल्हा येतो आणि त्या जिल्ह्यातील किती मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड आहे. म्हणजेच कोणते जिल्हे भरपाईला पात्र ठरू शकतात, याचा आढावा घेऊ.
पुणे विभागात सर्वाधिक १०७ मंडळांमध्ये पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त खंड आहे. पुणे विभागात कोणते जिल्हे येतात आणि या जिल्ह्यांमधील किती मंडळांमध्ये पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त खंड आहे.
विभाग आणि जल्हानिहाय मंडळांची संख्या
…………..
पुणे विभाग १०७ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
नगर…४२
पुणे…३६
सोलापूर…२९
……………
लातूर विभाग ३२ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
लातूर…२२
धाराशिव..७
परभणी…३
……… …….
कोल्हापूर विभागात ३० मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
सातारा…१६
सांगली…१३
कोल्हापूर…१
……………..
छत्रपती संभाजीनगर विभागात २५ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
छत्रपती संभाजीनगर…१३
जालना…७
बीड…५
……………..
नाशिक विभागातील २५ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
नाशिक…१५
जळगाव…१०
……………….
अमरावती विभागातील १२ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
अकोला…९
बुलडाणा…२
अमरावती…१
…………….
आपल्या मंडळामध्ये २१ दिवसांचा खंड पडला असं तुम्हाला वाटतं असेल, तर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन द्या. सर्वेक्षणाची मागणी करा. तसचं तालुका आणि जिल्हा पीक विमा समितीच्या सर्वेक्षणात सहभाग घ्या. सर्वेक्षण होताना नोंदी नीट होतात का? अहवाल काय येतो? याचाही अभ्यास करणं गरजेचे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.