
Nagar News : उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाकरिता निळवंडे धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या वर्षी अत्यंत कमी पर्जन्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून, पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे, की या वर्षी राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे वाया गेल्याने ग्रामीण भाग उद्ध्वस्त झाला आहे.
अशा स्थितीत सरकारने पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगाराबाबत तातडीने निर्णय घेऊन राज्यातील जनतेला दिलासा दिला पाहिजे. मात्र, असे काहीही होताना दिसत नाही. उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील १८२ गावांसाठी, अनंत अडचणींवर मात करून आपण निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्णत्वास नेली आहेत.
या वर्षी उन्हाळ्यात भंडारदरा व निळवंडे धरण मिळून दहा टीएमसी पाणी शिल्लक होते. अशा वेळी कालव्यांद्वारे दुष्काळी भागात पाणी सोडण्याची मागणी आपण सरकारकडे केली होती. या मागणीनंतर सरकारने केवळ चाचणीसाठी निळवंडे धरणातून पाणी सोडले व अवघ्या काही दिवसांत बंद केले.
आणखी काही दिवस पाणी सुरू राहिले असते, तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. सध्याच्या परिस्थितीत तातडीने निळवंडे धरणाचे पाणी डाव्या कालव्यातून सोडावे, तसेच उजव्या कालव्याचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे. यासाठी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.