
बुलडाणा : एकीकडे परतीच्या पावसाच्या वार्ता पसरत असतानाच दुसरीकडे हा पाऊस (Heavy Rainfall) मात्र अनेक ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गुरुवारी (ता.२०) दुपारपासून रात्री उशिरापर्यंत जिल्हयात बुलडाणा, मेहकर तालुक्यांत काही भागात जोरदार पाऊस झाला. धाड, रायपूर मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून सोयाबीनचे (Soybean Crop Damage) प्रचंड नुकसान झाले आहे.
बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात गुरुवारी (ता. २०) दुपारी दोन वाजेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. तब्बल पाच तास हा पाऊस पडल्याने तेथील बाणगंगा नदीला मोठा पूर आला. नदी काठावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. शिवाय शेतांमधील सोयाबीन सुडी, शेती उपयोगी पाइप व साहित्य वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
धाड- धामणगाव मार्गावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे पाच तास वाहतूक बंद होती. या पावसामुळे गणेश सुरडकर, योगेश सुरडकर यांच्या शेतामधील सोयाबीन सुड्या वाहून गेल्या. धाड मंडलात ६९, रायपूरमध्ये ७०.५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. म्हसला मंडलातही ४४.३ मिलि तर मेहकर तालुक्यात वरवंड मंडलात ३९.५ मिलि पाऊस झाला.
शुक्रवारी (ता.२१) सुद्धा मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरातील सावत्रा भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम जोरावर असतानाच हा पाऊस शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. सततच्या पावसाने ही कामे ठप्प होत आहेत. शिवाय सलग पावसाने सोयाबीन ओली झाल्याने काळवंडत चालली आहे. शेंगामधून कोंब निघालेले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.