
Akola Crop Damage Update : या भागात मागील आठवड्यात सातत्याने झालेल्या अवकाळी पावसाचा इतर पिकांसह भुईमुगाला मोठा फटका (Crop Damage) बसला आहे. सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
शेंगांमधून कोंब फुटल्याचे दानापूर परिसरात अनेक ठिकाणी दिसून आले आहे. तेल्हारा तालुक्यातील दानापूर व परिसरात सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा भुईमुगाची लागवड (Groundnut Cultivation) झालेली आहे.
या वर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झाले होते. रब्बी पिकांनाही वातावरण बदल, अवकाळी पावसाचा फटका बसला. आता उन्हाळी हंगामातील भुईमुगाचे पीक या भागात शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघेल की नाही, अशी स्थिती आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असल्याने शेतकरी चारा तसेच उत्पन्नासाठी उन्हाळी भुईमुगाची लागवड करतात. कृषी विभागाच्या लेखी ८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचे स्पष्ट आहे.
या पिकासह गहू, कांदा, केळी, संत्रा व भाजीपाल्याचीही मोठ्या क्षेत्रावर लागवड झालेली आहे. दानापूर, वारखेड, सौंदळा, हिवरखेड, कार्ला, बादखेड, चांगलवाडी, हिंगणी परिसरांत भुईमुगाची लागवड झालेली आहे.
जानेवारी महिन्यात लागवड केलेले हे पीक आता काढणीला आले आहे. काही शेतकऱ्यांनी काढणी सुरू केली. दरम्यान, गेल्या आठवड्यात या भागात जोरदार पाऊस झाल्याने भुईमुगाला कोंब फुटले.
त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या मध्य प्रदेशातून आलेले आदिवासी मजूर या भागात भुईमूग काढणी करीत आहेत. पावसामुळे मजुरांचेही हाल झाले.
जनावरांचा चारा होणार काळा
या भागातील पशुपालक भुईमुगाच्या चाऱ्याला मोठी पसंती देतात. मात्र भुईमूग काढायला सुरुवात झाली आणि अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गुरांचा चारा पावसामुळे काळा पडत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.