
वाशीम ः बालविवाहांना (Child Marriage) पायबंद घालण्यासाठी आता ग्रामसेवक (Gramsevak), पुरोहित, छायाचित्रकार, आचारी, मंडप डेकोरेटर, वाजंत्री पथक, डिजे, पाहुणे तसेच संबंधित बालकांच्या आई-वडिलांनाही थेट जबाबदार धरले जाणार आहे. त्यांना कायद्यानुसार दंड व शिक्षा होऊ शकते. महिला व बाल विकास विभागाने २१ ऑक्टोबरला याबाबत काढलेल्या सुधारित पत्रानुसार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना केल्या आहेत.
बालविवाह रोखण्यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषींना दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि आर्थिक दंडही होऊ शकतो. मात्र, एवढे सारे असूनही कायद्यांना न जुमानता लपूनछपून बालविवाह करण्याचे प्रमाण समाजात कायम आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाने कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या आहेत.
बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचा झपाट्याने प्रसार होत आहे. समाजात आजही मुलगी म्हणजे ओझे ही भावना कायम असल्यामुळेच वाशीम जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. कायद्यानुसार मुलाचे वय २१, तर मुलीचे वय १८ पेक्षा कमी असणाऱ्या लग्नसमारंभासाठी संबंधितांना दोन वर्षांचा सक्षम कारावास व एक लाख रुपये दंड होऊ शकतो.
‘१०९८’ क्रमांकावर द्या माहिती
‘‘बालविवाह होत असल्यास चाइल्ड लाइनच्या १०९८ तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, विशेष बाल पोलिस पथक, बाल कल्याण पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांनी बाल विवाहाबाबतची माहिती द्यावी’’, असे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियांका गवळी यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.