ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : सिन्नर (Sinnar) तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे (Heavy Rain) मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या पुरामुळे प्रामुख्याने सिन्नर शहरातील व्यावसायिक व शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी दाणादाण उडाली आहे. आता पाच दिवस उलटले तरी पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. पूरग्रस्तांना त्वरित मदत देणे गरजेचे असून, प्रशासन व शासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. यातून सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला. सरकारने तत्काळ मदत करून पूरग्रस्तांचे उघड्यावर पडलेले संसार पुनर्स्थापित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
सिन्नर शहरासह तालुक्याच्या विविध भागांत ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीसह, दुकान, घरे, कार व दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी (ता. ५) माजी आमदार राजाभाऊ वाजे, सरपंच डॉ. रवींद्र पवार यांच्या मागणीनंतर पाहणी केली. सिन्नर शहरातील सरस्वती नदीला आलेल्या महापुरामुळे व्यावसायिकांसह जवळपास शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. देवी रोड, नाशिक वेस, नेहरू चौक, गावठाण, वंजारी गल्लीत श्री. दानवे यांनी नुकसानीची पाहणी केली. आमचे स्वयंपाकाचे साहित्य, भांडी वाहून गेल्याने स्वयंपाक करण्यासाठी काहीच उरले नाही, असा टाहो पूरग्रस्तांनी फोडला. त्यावर श्री. दानवे यांनी प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा यांना सूचना दिल्या. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस शेगडी व संसारोपयोगी भांडी देण्याचे आदेश दिले.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सोनांबे शिवारातील गुरदरी बंधारा फुटल्याने बंधाऱ्यासह शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची दानवे यांनी पाहणी केली. घरांची पडझड, पिकांबरोबरच वाहून गेलेली शेती, शेतीसाहित्य आणि पावसाचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करा, अशा सूचना श्री. दानवे यांनी प्रशासनाला केल्या. या वेळी माजी आमदार योगेश घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उदय सांगळे आदी उपस्थित होते.
सुधारित अंदाजपत्रक करा
सोनांबे गावाच्या दक्षिणेला मुख्य रस्त्यापासून दोन ते अडीच किलोमीटर आत गुरदरी बंधारा आहे. तेथे वाहन पोहोचू शकत नसल्याने दानवे ट्रॅक्टरने प्रवास करून पोहोचले. या वेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ८.५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनविल्याचे त्यांना सांगितले. यावर केवळ मातीचा भराव टाकून चालणार नाही. सुधारित अंदाजपत्रक करून त्यात कॉंक्रिटच्या कामाची तरतूद करावी, अशा सूचना दानवे यांनी दिल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.