
Masoor Dal Stocks : सरकारकडून डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. ग्राहक व्यवहार विभागाने साठेदारांना सध्याच्या साठ्याची माहिती अनिवार्यपणे देण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेक साठेबाजांना मसूरचा साठा करत असल्याची बातमी समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे मुद्दाम डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात डाळींचे दर वाढण्याची शक्यता असते.
CNBC TV18 शी बोलताना, ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह म्हणाले की, देशातील काही कंपन्या बाजारपेठेत अनियमितता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये मसूर डाळीचा कोणताही अघोषित साठा आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने साठेबाजांना दिला आहे.
रोहित कुमार सिंह यांनी साप्ताहिक मूल्य आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. मसुर डाळीची बफर खरेदी अधिक व्यापक बनवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या.
किमान हमी भावाच्या जवळच्या किंमतीत उपलब्ध साठा खरेदी करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. जेव्हा कॅनडामधून मसूर डाळीची आयात आणि आफ्रिकन देशांमधून तूर डाळीची आयात वाढत असताना काही प्रमुख कंपन्या, ग्राहक राष्ट्राच्या हिताच्या विरोधात बाजारपेठेत अनियमितता आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिंह म्हणाले. मात्र, सरकार या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सिंह यांनी सांगितलं.
दरम्यान, आता सणासुदीचा काळ सुरु आहे. या काळात सरकार रास्त दरात सर्व डाळींची उपलब्धता करुन देणार आहे. साठेबाजांनी केलेला मसूर डाळीचा साठा बाजारात आणण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिली.
ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचा समतोल राखण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. भारतीय ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या हिताला ठेच पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास विभाग मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा सिंह यांनी दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.