
Baramati News : दुष्काळी भागात पाऊस कमी झाला आहे, बारामतीसारख्या ठिकाणी टँकर लावायची वेळ आली आहे, काही ठिकाणी लोक छावण्या काढा, अशी मागणी करायला लागले आहेत, काही ठिकाणी पेरण्या झाल्या पण पाऊस नसल्याने दुबार पेरण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांवर हे संकट आले आहे. राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.
बारामतीत माध्यमांशी बोलताना पवार यांनी राज्य सरकारला ही सूचना केली. टोमॅटोची आयात केंद्राने केल्याच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, देशांतर्गत किमती वाढल्यावर व शेतक-याला चार पैसे अधिकचे मिळू लागले हे दिसल्यावर आयातीची भूमिका केंद्र सरकार घेत असते.
शेतकऱ्याला चार पैसे अधिकचे मिळत असतील तर त्याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी त्याला अधिक यातना कशा देता येईल, अशी भूमिका आजचे राज्यकर्ते घेत आहेत, टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर आयातीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखावर डागण्या देण्यासारखे आहे.
नबाब मलिक यांना आज कारागृहातून सोडण्याची शक्यता असल्याचे मला सांगितले गेले, त्या नंतर मी त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये कसलाही संभ्रम नाही, विचाराने जे पक्ष एकत्र आले आहेत, ज्यांची भूमिका देश व राज्य पातळीवर भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही सहभाग असण्याचे कारण नाही. ही भूमिका स्पष्ट झाल्यानंतर कसलाही संभ्रम राहिलेला नाही. मी सोलापूर दौऱ्यातही माझी भूमिका स्पष्ट केली असल्याने तुम्ही पुन्हा हा प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करू नका, असे शरद पवार यांनी माध्यमांना सांगितले.
महाविकास आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला मुंबईत हयात हॉटेलमध्ये होत असून ती आयोजित करण्यासंदर्भातील जबाबदारी मी, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी घेतलेली आहे. ही बैठक उत्तम रीतीने होईल याची काळजी आम्ही घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.
ठाण्यातील रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होणे ही चिंताजनक बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यांच्याच जिल्ह्यातील रुग्णालयात अशी घटना घडते, याचा अर्थ राज्य कोणत्या दिशेने निघाले आहे, याचा एक उत्तम नमुना बघायला मिळाला. हे चित्र सुधारण्यासाठी कठोर व तातडीची पावले उचलण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.
राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर करून ‘ईडी’च्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. जयंत पाटील यांच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे पण विचारांच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मणिपूरचा विषय महत्त्वाचा होता. चीनच्या सीमारेषेवरील या प्रदेशातील लोकांच्या यातना असतील, त्याकडे केंद्र लक्ष देत नसेल तर देशासाठी चिंताजनक गोष्ट आहे.
त्या मुळे सातत्याने हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला पण त्यावर चर्चाच घडवून आणली नाही. पंतप्रधानाच्या भाषणात याचा जुजबी उल्लेख होता, दिलासा देण्यासाठी सक्तीच्या भूमिकेचा अभाव होता, त्या मुळे काहीही पदरात पडले नाही, असे शरद पवार म्हणाले.
लोकांचा प्रचंड प्रतिसाद....
रविवारच्या (ता. १३) सोलापूर दौऱ्याला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला, ठिकठिकाणी लोक मला भेटून प्रतिसाद देत आहेत. मंगळवारी ना. धों. महानोर यांच्या पळसखेडला जाऊन कुटुंबीयांना भेटणार आहे. त्या नंतर बीडला जाहीर सभा घेणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.