
Pune News : राज्यातील फलोत्पादनाला चालना देण्यासाठी ‘फळांचे गाव’ ही संकल्पना कृषी विभागाने स्वीकारली आहे. ३५८ गावांना या संकल्पनेत आणण्याचे प्रयत्न होत आहेत. विशेष म्हणजे १९ फळांचे उत्पादन घेणारे धुमाळवाडी गाव आता राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कृषी आयुक्तालयाने ‘फळांचे गाव’ ही संकल्पना मांडली आहे. फलोत्पादनात जिद्दीने वाटचाल करणाऱ्या गावाला ‘फळांचे गाव’ म्हणून प्रशस्तिपत्र बहाल केले जाते. या गावांना फलोत्पादनाशी निगडित सल्ला, योजनांचा प्रसार, विस्तारविषयक उपक्रमांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
कृषी आयुक्त सुनील चव्हाण व फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांच्या उपस्थितीत अलीकडेच धुमाळवाडीला (ता. फलटण, जि. सातारा) फळांचे गाव घोषित करण्यात आले. आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गावाला भेट देत फळबागांची माहिती घेतली व प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव केला.
‘फळांचे गाव’ म्हणून प्रशस्तिपत्र धुमाळवाडीला बहाल झाल्यामुळे गावात सध्या आनंदाचे वातावरण आहे. “या गावातील शेतकऱ्यांनी १९ प्रकारच्या फळबागा जोपासल्या आहेत. विशेष म्हणजे उत्पादनाबरोबरच प्रक्रिया, निर्यात, पर्यटनातही धुमाळवाडीने आघाडी घेतली आहे.
शेतकऱ्यांची ही धडपड राज्याच्या शेती क्षेत्रात धुमाळवाडीची वेगळी ओळख मिळवून देणारी ठरते आहे. या धडपडीला प्रोत्साहन मिळण्यासाठी धुमाळवाडीला ‘फळांचे गाव’ म्हणून नावारूपाला आणण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यामुळे गावातील तरुण शेतकऱ्यांना फळबाग लागवड व फळप्रक्रिया उद्योगात काम करण्याची प्रेरणा मिळेल,” अशा शब्दांत कृषी आयुक्तालयाने धुमाळवाडीचा गौरव केला आहे.
फळांचे गाव संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार फरांदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय कृषी अधिकारी कैलासराव धुमाळ, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांचे प्रयत्न सुरु आहेत. धुमाळवाडीसारख्या अनेक गावांना प्रोत्साहन देणारा सातारा जिल्हा ‘मेगा फूड पार्क’चा प्रयोगदेखील राबवितो आहे.
डॉ. मोते म्हणाले, ‘‘प्रत्येक तालुक्यात फळांचे गाव साकारावे, असा प्रयत्न कृषी विभागाचा आहे. त्यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ कार्यक्रमाचा उपयोग केला जाईल. शेतकरी व कृषी विभागाच्या विस्तार यंत्रणेचा समन्वय जुळून आल्यास भविष्यात राज्यात किमान ३५८ ठिकाणी ‘फळांचे गाव’ घोषित होऊ शकतात. त्यामुळे या गावांमधील कृषी पर्यटनालाही चालना मिळेल.’’
पथदर्शक फळबागा होणार तयार
राज्यात फलोत्पादनाचे समूह तयार करण्याचे काम सध्या कृषी विभागाकडून चालू आहे. पहिल्या टप्प्यात नाशिकमध्ये द्राक्ष; तर सोलापूरला डाळिंब समूह (हॉर्टिकल्चर क्लस्टर) तयार केला जात आहे. या समूहांमध्ये निवड झालेल्या गावांमध्ये फलोत्पादनाच्या सर्व योजना लागू केल्या जातील. समूहातील प्रत्येक गावात पथदर्शक फळबागा साकारल्या जातील. या बागा, तेथील तंत्र पाहून इतर गावांनी फळबागा उभाराव्यात, असा हेतू या संकल्पनेचा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.