
Solapur News : ‘‘जिल्ह्याला दरमहा १३ हजार मॅट्रिक टन धान्याची गरज आहे. ती भारतीय खाद्य निगम विभागाकडून पूर्ण केली जात आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांकडून तूर, हरभरा ही कडधान्य पुरेशा प्रमाणात खरेदी करण्यात आली.
भारतीय खाद्य निगम विभागाचा मोठा वाटा त्यात आहे,’’ असे विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना यांनी सांगितले. ‘‘धान्याच्या काढणी ते साठवणुकीपर्यंत शेतीमालाची नासाडी टाळावी, यासाठी सायलो पद्धतीच्या गोदामासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे,’’ अशी माहिती मीना यांनी दिली.
भारतीय खाद्य निगमच्या सोलापुरातील होटगी रस्त्यावरील एफसीआय कार्यालय येथे नुकतीच मीना यांनी भेट देऊन तेथील गोदामांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी भारतीय खाद्य निगम सोलापूरचे डेपो व्यवस्थापक नुपेश रामटेक, गुण नियंत्रण व्यवस्थापक जन्मेजय सिंग, सहायक व्यवस्थापक अनिल सुर्यवाड आणि भारतीय खाद्य निगम सोलापूर डेपोचे कर्मचारी उपस्थित होते.
मीना म्हणाल्या, ‘‘राज्यात ‘एफसीआय’ची आठ विभागीय कार्यालय आहेत. मालवाहतुकीसाठी रेल्वे वाहतुकीचा ‘एफसीआय’ला मोठा उपयोग होतो. तर रेल्वेला देखील ‘एफसीआय’च्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत आहे.
मागील काही वर्षात धान्याच्या गळतीमध्ये कमालीची घट करण्यात भारतीय खाद्य निगम विभागाला यश आले आहे. सोलापूर येथे देखील सायलो तंत्रज्ञानाचे गोदाम निर्मितीचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. तो पूर्ण झाल्यास याचा मोठा फायदा भारतीय खाद्य निगमला होईल.’’
‘महाराष्ट्रात ९१ गोदामे’
‘‘भारतीय खाद्य निगमची स्थापना ९१६५ मध्ये झाली. धान्य साठवणुकीच्या कामात संस्थेचा मोठा वाटा आहे. सध्या देशभरात पाच झोनल कार्यालये आणि महाराष्ट्रात ९१ गोदामाच्या माध्यमातून ९१ लाख मेट्रिक टन धान्य साठवण्याची क्षमता आहे. त्या माध्यमातून सुरक्षितरित्या साठवलेल्या आणि स्वच्छ धान्याचा पुरवठा देशवासियांना होतो,’’ असेही मीना म्हणाल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.