माणिकराव खुळे
सध्या निरभ्र आकाश, शांत वारा, जमिनीतील ओलावा (Soil Moisture), जमिनीपासून २ ते ३ किमी टक्केवारीत अतिउच्च असलेली (साधारण नव्वदी, शंभरीकडे झुकणारी) सापेक्ष आर्द्रता (Relative Humidity), वातावरणामुळे जमिनीला कमी उपलब्ध होणारी उष्णता, पहाटेचे किमान तापमान (Temperature) सरासरीपेक्षा साडेतीन तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशाने घसरण याचबरोबरीने एकसमान हवेचा दाब म्हणजे पहाटेच्या व उशिरा सकाळपर्यंत त्यात न होणारा बदल, रात्रीचा खालावलेला दवांक निम्न पातळीचा (खोली) निर्देशांक या वातावरणीय कारणामुळे सध्या पहाटेच्या वेळी खूप बादड (Morning Dew) पडत आहे.
अर्थात या वातावरणीय अटीत कायम सातत्य राहतेच असे नाही. म्हणजेच या स्थिती एकमेकांच्या हातात हात घालून न चालता त्यांच्यात विस्कळीतपणा आला की, बादड पडण्याचे प्रमाण कमी होते, सकाळच्या वेळी धुके पडते. वातावरण टोकाकडे सरकले म्हणजे भू-स्फटिकीकरणही होते.
दवांक तापमान ः
१) ज्या तापमानाला हवा अधिक पाण्याची वाफ सामावून(शोषून) घेऊ शकत नाही, म्हणजेच हवेत अधिक पाणी राहू शकत नाही, असे तापमान म्हणजे दवांक तापमान होय.
२) या तापमानाच्या खाली तापमान गेले की, हवेतून थेंबाच्या रूपाने पाणी बाहेर पडते. यालाच आपण दव (बादड) म्हणतो. या स्थितीत जर झुळूकीसारखी एकाकी थंडीची लाट आदळली तर दवाचे बर्फकणात रूपांतर होऊन भू- स्फटिकीकरण होते. यामध्ये अजूनही समुद्रसपाटी उंची सारख्या अटी आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अशी काही ठिकाणे आहे की, जेथे हिवाळ्यात नेहमी असे भू-स्फटिकीकरण पाहायला मिळते.
३) दवांक, सापेक्ष आर्द्रता, व हवेचे तापमान हे तिघे नेहमी एकमेकांशी निगडित असतात. म्हणून तर त्यांचे सूत्र तयार झाले. ठोकळमानाने सूत्र असे
दवांक तापमान (अंश सेल्सिअस ) = हवेचे तापमान(अंश सेल्सिअस)- (१०० टक्के सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत) /५)
उदा. आजचे पहाटेचे तापमान १५ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के होती म्हणून दवांक तापमान १२ अंश सेल्सिअस झाले. जेव्हा सापेक्ष आर्द्रता १०० टक्के होते की, जी सध्या शंभरीला भल्या पहाटे स्पर्श करते, तेव्हा जे हवेचे तापमान तेच दवांक तापमान ठरते. म्हणून तर सध्या किमान तापमानालाच हवेतील संपूर्ण पाण्याच्या वाफेचे दवात ( दवबिंदूत ) रूपांतर होत आहे. आपल्याला अधिक दव दिसत आहे.
४) दवीकरणानंतर जमीन आणि त्याचबरोबर पिके पूर्णपणे शुष्क करण्याची प्रक्रिया; आर्द्रशोषण, शुष्कन, शुष्कीकरण आणि पुनर्जलीकरण प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेला अडथळा होतो. कर्बवायूचे शोषण होत नाही. मुळांचे काम बंद होते. मुळकुज होते, अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावते. पिकांवरील कीड आणि रोगांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होऊन केवडा, करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.कांद्याच्या साठवण चाळीमध्ये सापेक्ष आर्द्रता जास्त असल्यास कांद्याची प्रत कमी होते. साठवण क्षमता कमी होते. कांदा सडण्याचे प्रमाण वाढते.
माणिकराव खुळे, ९४२३२१७४९५
(निवृत्त हवामान तज्ज्ञ,भारतीय हवामान विभाग )
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.