पुणे : पावसाच्या उघडिपीनंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. सोमवारी (ता.२६) विसापूर धरणाच्या (Visapur Dam) पाणलोट क्षेत्रात १८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी पिकांच्या नुकसानीत (Crop Damage)भर पडत आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे काही ठिकाणी खुरपणीचे कामे, तर काही ठिकाणी सोयाबीन, तूर, मूग, बाजरी अशा पिकांच्या काढणीचे कामे सुरू झाली आहेत. येत्या काळात काढणीच्या कामांना चांगलाच वेग येण्याची शक्यता असल्याने शेतकरी त्यादृष्टीने तयारी करीत आहेत.
मात्र, हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज जाहीर केल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. दसरा व दिवाळी सणांच्या काळात व मजुरांच्या टंचाईमुळे काढणी कशा पद्धतीने करायची या कामांत शेतकरी गुंतला आहे. सोमवारपासून (ता. २६) पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच पश्चिम पट्ट्यात अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी पडत आहे.
मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर घोड, वडिवळे, शेटफळ, चिल्हेवाडी, भाटघर, गुंजवणी, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, नीरा देवघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वीर, नाझरे, वडज, डिंभे, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरण होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.