
पथ्रोट, जि. अमरावती : अत्यंत परिश्रम घेऊन पिकविलेल्या संत्राफळाचे (Orange Crop) या वर्षी झालेली अतिवृष्टी, (Heavy Rain) सततचा पाऊस व परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान (Orange Crop Damage) केले. त्यामुळे अर्धेअधिक संत्राफळे रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांवर आली.
मागील दोन वर्षांपासून या परिसरामध्ये संत्रा बागा सौदा करून विकत घेण्याऐवजी संत्राफळे किलोने विकत घेण्याची सुरुवात झाली. सद्यःस्थितीत चांगल्या दर्जाच्या संत्रा फळांना २० ते २६ रुपये किलोपर्यंतचा व्यापाऱ्यांकडून भाव मिळत आहे. असे असले तरी या वर्षी सुरुवातीला अतिवृष्टीनंतर सततचा पाऊस तर शेवटी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या इतर पिकांसह संत्राउत्पादकांचे खूपच नुकसान झाले.
संत्राफळांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये शंभर कॅरेटच्या मागे दहा कॅरेट खराब झालेली संत्री रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. ज्यामध्ये पाच कॅरेट व्यापाऱ्यांचे तर पाच कॅरेटचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. मागच्या वर्षीपर्यंत संत्रा व्यापारी हा शेतकऱ्यांपासून संत्रा विकत घेतल्यानंतर त्याला खर्च लावत बांगलादेशसारख्या देशात पाठवून अधिकच्या भावाने विक्री करून नफा मिळवत होते.
परंतु या वर्षी केंद्र सरकारने संत्रा फळाच्या एका कॅरेटवर सतराशे रुपयांपर्यंतचा कर आकारल्यामुळे त्या ठिकाणी जाणारा संपूर्ण माल थांबून गेलेला आहे. या मुख्य कारणामुळे खरेदी केलेला संपूर्ण संत्रा हा भारतातील मागणी असलेल्या बाजारपेठांमध्येच विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.
त्यातच पावसामुळे खराब झालेल्या संत्रा फळांमध्ये आता झाडावरच अळ्या पडणे सुरू झाल्यामुळे आधी ज्या भावात व्यापाऱ्याला संत्रा विकला होता, त्याची तोड होईपर्यंत तो जागेवरच खराब होत असल्याने व्यापारी शेतकऱ्यांकडून रक्कम कमी करून घेत आहेत. यावर लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य असा भाव मिळून देण्यास पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.