
Jalgaon News : खानदेशात देशी सुधारित, देशी संकरित पुरवठा दरवर्षी विस्कळित असतो. यामुळे शेतकऱ्यांना या बियाण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरातेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. शासनाकडून व्यवस्थित दर निश्चित केले जात नसल्याने काही कंपन्या बियाण्याचा पुरवठा करीत नाहीत.
संबंधित कंपन्या आपले बियाणे मध्य प्रदेश व गुजरातेत चांगले दर मिळत असल्याने वेळेत व मुबलक प्रमाणात पाठवितात. या बियाण्यातून एकरी आठ ते १० क्विंटल कापसाचे उत्पादन येते. खोडवा किंवा फरदड पीकही व्यवस्थित येते, असा अनुभव शेतकऱ्यांना आहे.
एका कंपनीकडून खानदेशात आपल्या देशी कापूस बियाण्याचा पुरवठा केला जातो. पण हा पुरवठा जूनअखेरीस होतो. तसेच या बियाण्याची किमान एक ते सव्वा लाख पाकिटे जळगाव जिल्ह्यात हवी असतात, पण फक्त २५ ते ३० हजार पाकिटेच दोन टप्प्यांत येतात.
त्यातही मर्जीतील मंडळीला प्रथम ही पाकिटे दिली जातात. तोपर्यंत कापूस लागवडीची योग्य वेळ निघून जाते. यामुळे या कंपनीचे बियाणे घेण्यासाठी शेतकरी मध्य प्रदेश व गुजरातेत आपल्या परिचयातील कृषी केंद्रचालक, कापूस उत्पादक, नातेवाइकांकडे जाऊन त्याची रीतसर निश्चित दर देवून व पावती घेऊन खरेदी करून घेत आहेत.
मध्य प्रदेश, गुजरातमध्ये एका शेतकऱ्याला कमाल दोन ते तीन पाकिटेच दिले जात आहेत. कारण एका शेतकऱ्याला हवी तेवढी पाकिटे दिल्यास तेथे संबंधित बियाण्याची टंचाई वाढेल, अशी भीती तेथील विक्रेते व प्रशासनास आहे. यामुळे तेथेही दोन ते तीन एकरवर लागवडीसाठी आवश्यक बियाणेच खानदेशातील शेतकऱ्यांना दिले जात आहे.
वेळ अन् प्रवास खर्च वाढला
खानदेशात मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, अक्कलकुवा, शहादा, नवापूर भागातील शेतकरी परराज्यांतून देशी कापूस बियाणे अधिकचे खरेदी करीत आहेत.
तेथे संबंधित बियाणे ९५० ते १००० रुपयांत मिळत आहे. यात शेतकऱ्यांना प्रवास, कृषी केंद्रांत वणवण फिरण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळ व पैसा अधिकचा लागत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.