
Nanded News : निष्क्रिय लोकप्रतिनिधी व बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेमुळे कंधार-लोहा तालुक्यांत शेतीचे नुकसान झाले नाही, असा शेतकरीविरोधी अहवाल शासनाकडे पाठविल्याने बळीराजा पीकविम्यासह शासकीय मदतीपासून वंचित राहणार असून, कंधार-लोह्याला नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे सोमवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘बीआरएस’ नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली.
कंधार येथील संपर्क कार्यालयात त्यांनी शुक्रवारी (ता. ११) पत्रकारांशी संवाद साधताना शंकरअण्णा म्हणाले, की जुलै महिन्यात जिल्ह्यासह कंधार-लोहा तालुक्यांतही विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली. निष्क्रिय आमदार व खासदार आणि बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेमुळे शासनाकडे चुकीचा अहवाल पाठविण्यात आला. सहा जुलैपासून महिनाभर सर्व मंडलांत ७० ते ८० मिलिमीटर पाऊस किमान सहा वेळा झाला.
केवळ येथील आमदार व खासदाराच्या निष्क्रियतेमुळे बळीराजाला मदतीपासून व पुढे मिळणाऱ्या पीकविम्यापासून वंचित ठेवण्याचे काम झाले, असा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या दुःख व हक्कासंबंधी यांना काही देणे-घेणे नाही. हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी आमदार व खासदाराच्या दुर्लक्षामुळे कंधार-लोह्यातील शेतकरी विम्यापासून वंचित राहिले होते. आताही त्यांच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी शासकीय मदत व पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले. या वेळी दत्ता पवार, ॲड. विजय धोंडगे, शिवराज धोंडगे, दत्ता कारामुंगे, शिवदास धर्मापुरीकर आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.