
अमरावती : ‘‘गेल्या ४२ वर्षांत कांदा दराचा (Onion Rate) प्रश्न सुटला नाही. पिकविणारे कमी आणि खाणारे जास्त त्यामुळेच बहुमताचा विचार करून सरकार कांदा दराच्या (Onion Market) नियंत्रणाचे धोरण ठरवते. परिणामी आंदोलनाची हत्यारे आणि सूत्र बदलण्याची गरज आहे,’’ असे मत सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी व्यक्त केले.
गुरुकुंज मोझरी येथे शनिवारी (ता.२१) आयोजित दहाव्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. शिंदे म्हणाले, ‘‘सहा वर्षांचा असल्यापासून कांदा दराबाबत आंदोलन अनुभवली आहेत. मात्र आजही त्याच मुद्द्यावर आंदोलन केली जातात.
गेल्या ४२ वर्षांपासून कांदा प्रश्नावर एकाच मुद्द्यावर आंदोलन होत आहे. सरकार कोणतेही असले तरी ते पिकविणारा आणि खाणारा अशी वर्गवारी करते. त्या आधारे सरकार स्तरावर निर्णय घेतले जातात.
कांदा उत्पादक चार लाखांवर असले तरी खाणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. कांदा उत्पादकांऐवजी खाणाऱ्यांचा विचार करून दर नियंत्रणाबाबत सरकार निर्णय घेते.’’
‘‘सह्याद्री फार्मच्या माध्यमातून शेतमाल विपणनाची एक पद्धती विकसित केली. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांनी एकट्याला शक्य नसल्यास सामूहिकस्तरावर सक्षमतेसाठी प्रयत्न केला पाहिजे.
कच्चामाल विकताना व्यापारीधार्जीनी व्यवस्था आत्मसात करावी लागते. शेतीमालाचे मूल्यवर्धन केल्यास माल विक्रीच्या वेळी आपल्याला अपेक्षित दर सांगता येतो. कापूस उत्पादकांनी गाठी तयार करून विकल्यास त्यांना रुई, सरकीच्या बाबतीत निर्णय घेता येतो.
अशाच प्रकारच्या व्यवस्थेवर शेतकऱ्यांनी यापुढे काम केले पाहिजे. शासकीय नोकरदारांकडे सरकारी व्यवस्थेला कोंडीत पकडण्याचे अनेक हत्यार आहेत. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जाते.
शेतकऱ्यांकडे मात्र असे कोणतेच हत्यार नसल्याने त्यांचे प्रश्न कायम आहेत. यापुढे उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या संशोधकांनी भाववाढ आणि शेतकरी हा सरकारला कोंडीत कसा पकडू शकतो, यावर संशोधन केले पाहिजे,’’ असे शिंदे म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रमाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांनी तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील अनेक संदर्भ या ळी मांडले. साहित्यिक पुष्पराज गावंडे म्हणाले ‘‘शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे आमिष दाखविले जाते. मात्र अधिक उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अधिक खर्च करावा लागतो.
त्या तुलनेत उत्पन्न मात्र कमी मिळते, याचा विसर पडतो. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राजकारण विरहित दबाव गट निर्माण केला पाहिजे.’’ आयोजक गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक केले. विदर्भ साहित्य संघाचे रवींद्र शोभणे, संमेलन अध्यक्ष सानप या ळी उपस्थित होते. मनीषा रिठे यांनी सूत्रसंचालन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.