
जळगाव : जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील शेतकऱ्याच्या कर्ज खात्यातून पीकविमा (Crop Insurance) रक्कम कपात होऊनही अद्यापपर्यंत या शेतकऱ्याला केळी पीकविम्याची (Banana Crop Insurance) नुकसानभरपाई मिळालेली नाही.
त्यामुळे हतबल शेतकऱ्याने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करून मदत मिळवून देण्याची मागणी करत अन्नत्यागाचा इशारा दिला आहे. नंदगाव येथील वासुदेव अवचित सोनवणे या शेतकऱ्याने नंदगाव शिवारातील आपल्या दोन हेक्टर शेताचा केळी पिकाचा विमा बँकेमार्फत काढला होता.
विमा रकमेची कपात
पीकविमा योजनेंतर्गत केळी या पीकविम्याची रक्कम जळगाव येथील प्रतापनगरमधील आयसीआयसीआय बँकेच्या पीककर्ज खात्यातून २९ ऑक्टोबर २०२१ ला कपात करण्यात आली होती.
मात्र पीकविमा मंजूर होऊनही या शेतकऱ्याला तीन महिने उलटूनही नुकसानभरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आलेली नाही. शेतकरी मागील तीन महिन्यांपासून या प्रकरणात बँक, विमा कार्यालय, तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आदी कार्यालयांमध्ये विचारणा करीत असून, आजतागायत त्यांना बँकेकडून याबाबत उडवाउडवीचीच उत्तरे मिळत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तीन महिन्यांपासून शेतीचे काम सोडून पीकविमा रक्कम मिळविण्यासाठी हेलपाटे खावे लागत असल्यामुळे वासुदेव सोनवणे हतबल झाले असून, त्यांनी जिल्हाधिकारी तथा पीकविमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अमन मित्तल यांना निवेदन देत आपल्या स्तरावरून त्वरित चौकशी करून विमा नुकसानभरपाई मिळवून देण्याची विनंती केली.
न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय मार्गाने बेमुदत अन्न सत्याग्रह करणार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.