
Javhar News : तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे; मात्र निसर्गाचा लहरीपणा, खते, बी-बियाणे व वाढती मजुरी या सगळ्यांचा मेळ बसवताना बळीराजाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. शिवाय इंधन दरवाढ, शेतमजुरांची कमतरता, यामुळे भातशेती करणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे. अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या पालघरमध्ये भातउत्पादक विविध समस्यांनी हैराण झाला आहे. भातशेतीच्या खर्चात दरवर्षी वाढ होत असल्याने खर्चाचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याला कसे तोंड द्यावे, असा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. तसेच रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. खत कंपन्यांकडून दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आहेत.
सध्या यांत्रिकीकरणाने शेती सोपी झाली आहे; मात्र अलीकडच्या काळात कृषीविषयक विविध यंत्राच्या किमती अधिक वाढल्या आहेत. त्यासोबतच रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके व मजुरीतही दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. यांत्रिकीकरणाला लागणाऱ्या इंधनाचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
याशिवाय मशागतीचाही खर्चही वाढला आहे. एकंदरीत उत्पादन खर्च वाढत असल्याने ताळेबंद जुळविताना बळीराजाच्या नाकेनऊ येत आहे.यंदाच्या खरीप हंगामाला जोमाने सुरुवात झाली आहे. अलीकडे मशागत वगळता शेतीची सर्वच कामे ट्रॅक्टरद्वारे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे.
उत्पादन खर्चात वाढ
अलीकडे यांत्रिकीकरणावर जोर दिला जात आहे. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. प्रतितास १ हजार रुपये मोजावे लागत आहेत, त्यामुळे महागाईने सीमा पार केली आहे. साहजिकच इंधन दरवाढ झाल्याने ट्रॅक्टर मालकानेही मशागतीचे दर वाढविले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.