
Yavatmal News : फवारणी दरम्यान होणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूसंदर्भात सद्यःस्थितीतील कीटकनाशक कायद्यात श्वसनातून होणाऱ्या विषबाधेचा उल्लेख नाही. त्या पार्श्वभूमीवर या कायद्यात बदल अपेक्षित असल्याचे मत शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आणि कृषी विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे नोंदविले आहे.
दामले यांच्या पत्रानुसार, श्वसनातून होणाऱ्या विषबाधेच्या परिणामीच गेल्या काही काळात फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधेमुळे दगावणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र श्वसनातून होणाऱ्या विषबाधांबाबत सद्यःस्थितीतील कीटकनाशक कायद्यात नोंदच नाही. त्यामुळे भारतीय कीटकनाशक नियम १९७१ मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
त्याकडे अजूनही सरकारने गांभीर्याने लक्ष्य दिले नाही. भारतीय कीटकनाशक अधिनियम १९७१ अनुसार कीटकनाशक विक्रेत्याला बिलासोबत लेबल देणे अनिवार्य आहे. मात्र असे माहितिपत्रक कृषी सेवा केंद्रातूनच दिलेच जात नाही.
याशिवाय लेबलवर जी माहिती असते ती संपूर्ण अक्षरे अतिशय बारीक असतात. त्यासाठी ठळक अक्षरात माहितिपत्रक उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजे.
कीटकनाशकाच्या लेबलवर नमूद केलेल्या मात्रेपेक्षा कीटकनाशकाची जास्त मात्रा वापरू नये. मात्र याकडे दुर्लक्ष होते यातून विषबाधांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे, असेही दामले यांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.