
बुलडाणा ः प्रशासकीय यंत्रणेला आंदोलनाची भाषाच आता समजते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जळालेली रोहित्रे (Electricity Transformer) बदलून देण्याची वारंवार मागणी करून दुर्लक्ष करणाऱ्या महावितरण (Mahavitaran) यंत्रणेने मात्र ठिय्या आंदोलन सुरू होताच रात्री रोहित्रे बदलून देण्यास प्रारंभ केला.
जळालेली विद्युत रोहित्रे तातडीने बदलून मिळावी, या मागणीसाठी शनिवारी (ता.१९) सायंकाळपासून ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसोबत बुलडाणा महावितरणच्या मेन्टेनन्स विभागात मुक्काम आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यानंतर घडामोडी झाल्या.
जळालेली रोहित्रे बदलून मिळावीत, यासाठी शेतकरी सातत्याने मागणी करीत होते. प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. थकीत वीजबिलाचा तगादा लावला जात होता. हा प्रकार तुपकर यांना समजताच त्यांनी शेतकऱ्यांसह शनिवारी महावितरणच्या मेन्टेनन्स विभागाचे कार्यालय गाठले. चर्चेनंतर कुठलाही तोडगा निघत नसल्याने तत्काळ मुक्काम आंदोलन सुरू केले. त्यानंतर प्रशासनाने एक पाऊल मागे घेत शनिवारी रात्रीच जळालेली १० विद्युत रोहित्रे आंदोलनकर्त्यांना बदलून दिली.
आठ तास विजेची मागणी मान्य
महावितरणचे महाराष्ट्राचे प्रमुख ताकसांडे व अकोला विभागाचे मुख्य अभियंता डोळे यांच्याशी तुपकर यांनी चर्चा केली. बुलडाणा जिल्ह्यातील जळालेली रोहित्रे तातडीने विलंब न लावता बदलून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. शेतकऱ्यांना रोटेशनमध्ये ८ दिवस दिवसा आठ तास विद्युत पुरवठा करावा, ही मागणी देखील मान्य करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.