
Mango Season छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांचा लाडका केसर आंबा (Kesar Mango) यंदा लवकर येण्याचे संकेत खरे ठरताना दिसत आहेत. तुळजापूर, पंढरपूर व सांगोला भागांतील काही बागांमधील आंबा (Mango Arrival) मार्चअखेर किंवा फारतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढायला येतो आहे.
अर्थात, काही बाबींसाठी अनुकूल व काही बाबींसाठी प्रतिकूल असणाऱ्या सध्याच्या वातावरणात व्यवस्थापनात खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही आंबा तज्ज्ञांचे म्हणणे आहे
महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या माहितीनुसार, कोकणा व्यतिरिक्त इतर महाराष्ट्रामध्ये ४५ हजार हेक्टरवर आंबा लागवड आहे. त्यापैकी साधारणतः १० ते १५ हजार हेक्टर आंबा बागा उत्पादनक्षम असाव्यात.
त्यातील काही बागा २० ते २५ वर्षे जुन्या आहेत. तर नवीन ८ ते १० वर्षांतील बहुतेक बागा अतिघन लागवड पद्धतीने लागवड केल्या आहेत.
कोकण वगळता, मराठवाड्यासह राज्यातील केसर आंबा बागा साधारणत: डिसेंबर, जानेवारीमध्ये मोहरतात. यंदा आंबा बागांना मोहर लागणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सुरू राहिले. फेब्रुवारीअखेर भौतिक सर्वच आंबा बागा कमी अधिक प्रमाणात मोहरल्या.
महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या राज्यातील विविध भागांतील केसर आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात व्यवस्थित व्यवस्थापन केले.
त्यामुळे अनेक केसर आंबा बागा पाऊस लांबला तरी नेहमीच्या वेळेपूर्वी महिनाभर आधी म्हणजे नोव्हेंबरमध्येच मोहरणे सुरू झाल्या.
सुरुवातीला मोहरलेल्या काही बागेतील आंबा मार्च अखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढणीला येतो असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वेळीच कल्टारचा वापर, त्यामुळे मोहर लवकर तर आंबा लवकर असे गणित जुळून आल्याचे तज्ज्ञ आणि शेतकरी सांगतात. त्यामुळे हापूस, गुजरात केसरला चुकवून येणारा केसर भाव खाऊन जाईल, अशी आशा केसर आंबा उत्पादकांना आहे.
गारपीट व वादळ झाले नाही तर केसर आंब्याच नुकसान होणार नाही. भुरी, करपा, तुडतुडे, फळमाशी नियंत्रणासाठी आंबा उत्पादकांनी खबरदारी घ्यावी. सध्याचे वातावरण प्रतिकूल दिसत असले तरी आंबा आकारवाढ, फळगळ नियंत्रण व फळ लवकर काढणीला येण्यासाठी पोषक आहे.
- भगवानराव कापसे, आंबा तज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर
माझी दहा एकर केसरची बाग आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात काही आंबा मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढणीला येईल. नेहमी एप्रिल अखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात आंबा काढणीला येतो. यंदा एप्रिलअखेर आंबा पूर्ण काढला जाईल, अशी आशा आहे.
- समाधान वाघमोडे,
केसर आंबा उत्पादक, कुरुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर
माझ्याकडे केशर आंब्याची ४०० झाडे आहेत. त्यापैकी ३०० झाडांना फळ लगडली आहेत. मार्चअखेर किमान ४० टक्के आंबा काढणीला येतो आहे. उर्वरित एप्रिलमध्ये पूर्ण निघून जाईल.
- रमेश जाधव, आरळी खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.