Drought Condition : चाळीसगाव, भडगाव, धुळे भागांत दुष्काळी स्थिती

Drought Situation : पावसाळा होऊन अडीच महिने होत आले, तरी अद्यापही धुळे, जळगाव जिल्ह्यांतील चाळीसगाव, भडगाव तालुक्यांत दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
Drought
DroughtAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : पावसाळा होऊन अडीच महिने होत आले, तरी अद्यापही धुळे, जळगाव जिल्ह्यांतील चाळीसगाव, भडगाव तालुक्यांत दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. माळरानातील गवत वाळू लागले असून, पावसाचा खंड १९ ते २२ दिवसांचा आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

चाळीसगावात अडीच महिन्यांत केवळ २२२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्याअखेर ४३७.११ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. चाळीसगाव तालुक्यात पाऊस नसल्याने अनेक गावात पिके सुकू लागली आहेत. तालुक्यावर दुष्काळाचे ढग जमा होत असल्याचे चित्र आहे.

Drought
Drought Condition Maharashtra : १५ जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद, ऑगस्ट महिन्यात भीषण परिस्थिती

धुळ्यात ५७५ मिलीमीटर पाऊस पडतो. पण याच्या निम्मेही पाऊस झालेला नाही. पुढे फक्त एक महिना पावसाळा आहे. यातच पिकांना आजघडीला पावसाची नितांत गरज आहे. पुढे पाऊस आल्यास टंचाई दूर होईल. पण पिके पूर्णतः हातची जातील, अशी स्थिती या भागात आहे.

अडीच महिने होत आले तरी तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. फक्त रिमझिम पाऊस होत आहे. किरकोळ पावसावर आलेल्या पिकांची ढगाळ वातावरणामुळे वाढ खुंटत असून, तण मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने कपाशीसह अन्य पिकांची खुरपणीसाठी शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे.

Drought
Drought in Maharashtra : दुष्काळाचं संकट दार ओलांडून घरात आलंय का?

यंदा रिपरिप पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण वाढल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. आधीच कोळपणी, वखरणी, औषध फवारणी यांचा खर्चाचा ताळमेळ बसत नसताना वाढलेल्या तणाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे.

पावसानंतर शेतकऱ्यांनी नगदी पीक कापसासह अन्य पिकांची लागवड केली. मात्र त्यानंतर केवळ रिमझिम पाऊस होत असून, त्यातून पिकांना केवळ सलाइन मिळत आहे. दररोजचे ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटत चालली आहे.

विशेषत: कोरडवाहू क्षेत्रात अत्यल्प पावसामुळे भयावह स्थिती आहे. अधूनमधून रिमझिम पाऊस येतो. त्याने न जमिनीत पुरेशी ओल होते ना वाढ होते. कोरडवाहू क्षेत्रातील पिके सुरुवातीला तजेलदार वाटत होती. आता मात्र पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. काही गावांमध्ये दुबार पेरण्याही झाल्याचे सांगण्यात येते.

काही भागांत पिके तग धरून

पीक वाढीस असताना दमदार पाऊस झाला नसल्याने पिकांची वाढ होऊन अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल, याची शाश्‍वती नाही. बागायत क्षेत्रातील पिके काहीअंशी तग धरून असले तरी कोरडवाहू क्षेत्रातील स्थिती गंभीर होऊ लागली आहे. ९७ टक्के पेरणी या भागात झाली आहे. भडगाव, चाळीसगाव व पाचोरा, धुळे भागात पांढरे सोने, अर्थात कापसाची लागवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com