
Maharashtra Drought Condition : थोडा पाऊस झाला की अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणारा मीडिया आणि राजकीय नेतृत्व, गेल्या 25 ते 30 दिवसांपासून पाऊस नाही तरीही एक शब्द बोलायला तयार नाहीत. आता कोठे जाऊन बसले आहेत? ग्रामीण भागातील पिकांची वास्तविकता कधी समजून घेतील?? शेतकऱ्यांसाठी निर्दयी का झाले असावेत.
जून महिन्याच्या 25 तारखेपर्यंत पाऊस आला नाही. मधल्या 20 ते 22 दिवस पाऊस थोडाफार झाला, त्यानंतर 20 जुलै पासून पाऊस गायब झाला आहे. जवळजवळ 25 ते 30 दिवसांपासून पाऊसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास काढून घेतल्याची अवस्था झाली आहे. पिकांंसाठी आवश्यक लागणारा ओलावा जमिनीत शिल्लक नाही. 10 ते 15 इंच इतका खोलवर ओलावा गेला असल्याने पिके अर्धे करपलेली तर बाकीचे करपण्याच्या मार्गावर आहेत.
सद्यस्थितीत कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास 70 टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत. काळ्या जमिनीतील थोडीशी तग धरून असलेली पिके दिसतात, पण पुरेशा ओलाव्या अभावी ते देखील काही दिवसांमध्ये करपून जातील असे वाटते. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का नाही हे सांगणे कठीण आहे. हा शेतकरी-शेतमजुरांवरील फार मोठा नैसर्गिक तसाच मानवनिर्मित अघात आहे.
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात विदर्भ (यवतमाळ) आणि मराठवाडा (देगळूर) या विभागाच्या काही तालुक्यात पाऊसाने हजेरी लावली. पण सर्वदूर झाला नाही. अनेक तालुके कोरडेच आहेत. आता सर्व भरोसा परतीच्या पाऊसावर आहे. तो पाऊस पडला तर रब्बी हंगाम. नाहीतर यावर्षी झोळी रिकामी राहणार!! राजकीय नेतृत्वाने तर पावसाचे आणि शेतीच्या प्रश्नांच्या संदर्भातील देणे-घेणे सोडून दिले आहे.
दुष्काळ कधी पडतोय याची वाट पाहत आहेत का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड ऊन पडले, वातावरणात प्रचंड धग निर्माण झाली. परिणामी सोयाबीन, मूग, उडीद, धने इत्यादी पिकांना फुलांचा पहिला बहर आलेला पूर्ण गळून गेला. फुले गळून पडल्यामुळे उत्पादन घटणार आहे हे नक्की.
नव्याने फुले लागून पिके येतील याचा शेतकऱ्यांना काहीच भरोसा नाही. पण या होणाऱ्या नुकसानीचे काय? पावसाच्या अभावी होणारे नुकसान थोपवता आले असते का? योग्य नियोजन आणि पाणी वापराचे तंत्रज्ञान, व्यवस्थापन या आधारे निश्चित शक्य होते.
प्रश्न असा आहे की, कमी पाण्यावर कोरडवाहू, जिरायती, माळरानची पिके कशी जगवायची? याविषयी शासन, कृषी विभाग- कृषी विद्यापीठ यांच्याकडून तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, पाणीसाठे निर्मितीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात येत नाही. जर देण्यात आले असेल तर 99 टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही.
शेतकऱ्यांना शासनाने पिके वाचवण्यासाठी तज्ज्ञ, जाणकार, तंत्रज्ञान, व्यवस्थापन या आधारावर कृतिशील स्वरूपातून कार्यक्रम देणे आवश्यक आहे. एक अभियान उभे करणे गरजेचे होते. पण प्रशासन, समाज व्यवस्था आणि राजकीय यंत्रणेमध्ये प्रचंड अनास्था आली आहे. ती कशी दूर करायची हा प्रश्न आहेच. ही दूर करण्यासाठी शासनाकडून पुढाकार घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी प्रथम कृषी विभागाने तालुक्याच्या ठिकाणे सोडून गावांच्या मातीत मिसळून गावातील मातीशी नाळ जोडून घेणे आवश्यक झाले आहे. पण असे होत नाही. आता शेतकाऱ्यांच्या समोर पूर्ण अंधार निर्माण करून ठेवला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.