
फुलवडे, ता. आंबेगाव ः तालुक्यातील पश्चिम भागातील पाटण खोरे हे पावसाचे माहेरघर समजले जाते. यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाला (Rabi Season) दिलासा मिळाला आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती होत असल्याने, शेतकऱ्यांना पाणीटंचाईला (Water Shortage) सामोरे जावे लागते. पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचे नियोजन आणि उपसासिंचन योजना (Sub-Irrigation Scheme)करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आदिवासी पाणलोट क्षेत्रात कोल्हापूर पद्धतीचे छोटे-छोटे बंधारे असून, डोंगर माथ्यावरून येणारे पाणी या बंधाऱ्यांमध्ये अडविले जाते. त्यातून उपसा सिंचन करून आदिवासी शेतकरी बागायती शेती करीत असतो. त्यामुळे सावरली, साकेरी, पिंपरी, पाटण, म्हाळुंगे, कुशिरे खुर्द, कुशिरे बुद्रुक, नानवडे, दिगद, मेघोली, बेंढारवाडी येथील शेतकऱ्यांना रब्बी पिके घेता येतात.
या खोऱ्यात चार महिने जोरदार पाऊस पडत असल्याने चार महिने सूर्याचे दर्शनदेखील लवकर होत नाही. त्यामुळे डिंभे धरणाचा पाणीसाठा हा मोठ्या प्रमाणात भरत असतो. प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान हे भात शेतीवर अवलंबून असते. भात हेच एकमेव व मुख्य पीक असल्याने भात शेतीच आदिवासी शेतकऱ्यांचा जीवनाचा मुख्य आधार समजला जातो.
मात्र, उन्हाळ्यातील चार महिने या आदिवासी बांधवांना घोटभर पाण्यासाठी दऱ्या-खोऱ्यातील टाक्यांमधून अथवा पाणलोट क्षेत्रातील गाळमिश्रित पाणी वापरावे लागते. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. येथील आदिवासी जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी या भागात लवकरात लवकर उपसा सिंचन योजना कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.