
Amravti News : विमा कंपनीने सर्वेक्षण करण्यास नकारघंटा वाजविली होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केलेल्या सादरीकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला शनिवारपासून (ता.९ )सोयाबीन पिकांच्या स्थितीचे सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश जिल्हास्तरीय बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. ६) जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेत पीकस्थितीचा आढावा घेण्याकरिता बैठक झाली. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासह मोर्शी, अचलपूर व अमरावती येथील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनीकडून राजू सूर्यवंशी, मार्कोश गोमी, अविनाश नरोडे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अतुल कळसकर, आरआरसीचे डॉ. हेमंत डीके, तीन शेतकरी प्रतिनिधी व लीड बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते
ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागांत खंड पडला आहे. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत हवा तसा पाऊस झालेला नाही. यादरम्यान पिकांची स्थिती वाईट होऊ लागल्याने विमा अग्रिम मिळावे, यासाठी गाव व तालुकापातळीवर मागणी वाढू लागली आहे. तालुका कृषी कार्यालयांवर आंदोलन होत असून निवेदने येऊ लागली आहेत.
पावसाअभावी पिकांच्या होत असलेल्या स्थितीचे जिल्हाभर सर्व पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी बैठकीत झाली. मात्र त्यास विमा कंपनीने नकार दिला. ज्या भागात खंड आहे अशाच ठिकाणचे सर्वेक्षण करण्याच्या मतावर कंपनी ठाम होती. अखेर जिल्ह्यात सोयाबीनची स्थिती सर्वाधिक वाईट होत असून या पिकांचा सर्व तालुक्यात सर्वे करण्याची मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी लावून धरली.
त्यासाठी आवश्यक ते सादरीकरणही केले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सातपुते यांची मागणी मान्य करीत विमा कंपनीला शनिवारपासून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे कंपनीने बॅकफूटवर येत कृषी कार्यालयास कागदपत्रे व गावांची पीकनिहाय यादी मागितली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.