
Pune News राज्यातील रब्बी हंगामावर डुख धरल्यागत वारंवार चालून येणाऱ्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) वादळी वाऱ्यासह सलग दोन दिवस २१ जिल्ह्यांतील पिकांची नासाडी (Crop Damage) केली. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे ७२ तासांत ५० हजार हेक्टरवरील पिके नष्ट केली आहेत, असा अंदाज शासकीय यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात नेमके किती नुकसान झाले याचा अंतिम आकडा अजूनही शासकीय यंत्रणेकडे आलेला नाही. सलग तीन दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये तुफान पाऊस होतो आहे. त्यामुळे पंचनामे झालेले नाहीत.
दिवसभर प्रचंड उकाडा आणि दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीट असे तंत्र ‘अवकाळी’ने ठेवलेले आहे.
महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी विविध भागांमध्ये पंचनामे करण्यात मग्न आहे. हतबल झालेल्या बळीराजाला आता सरकारी मदत आणि विमा नुकसान भरपाईकडे डोळे लावून बसावे लागत आहे.
राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील म्हणाले की, सुदैवाने रब्बी हंगामातील पिकांची बहुतेक भागात काढणी झाली आहे. मात्र, उशिरा लागवड केलेल्या गहू, हरभरा, रब्बी ज्वारीचे काही भागात नुकसान झाल्याची शक्यता आहे.
दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पिकांमुळे मुख्यत्वे भाजीपाला पिकांची हानी झाली आहे. तसेच, द्राक्षासह आंबा, डाळिंब, पपई अशा फळपिकांची हानी होणे शक्य आहे.
कृषी विभागातील सूत्रांंच्या म्हणण्यानुसार, ७ व ८ एप्रिल या दोन दिवसांत राज्यात अवकाळी पावसामुळे २१ जिल्ह्यांतील ३४ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज आहे.
त्यात सर्वात जास्त नुकसान अहमदनगर जिल्ह्यात झाले असून दहा हजार हेक्टरवरील मका, कांदा, वाटाणा, कलिंगड, आंबा, झेंडू, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, डाळिंब व कांदा अशा सर्व पिकांचे नुकसान झाले आहे.
दोन दिवसांतील नुकसानीचे पंचनामे सुरू असताना रविवारी (ता. ९) पुन्हा राज्याच्या काही जिल्ह्यांत गारपीट झाली. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली असून यात मका, गहू, हरभरा, ज्वारी, संत्रा व आंबा पिकाचा समावेश आहे. बीडसह गेवराई, आष्टा, पाटोदा, केज तालुक्यात अवकाळी बरसला असून या भागातील तीन हजार हेक्टरवरील लिंबू, द्राक्षे, कांदा, गहू, हरभरा, डाळिंब व आंब्याचे नुकसान झाले आहे.
धाराशिवसह तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा भागातील काही गावांमध्ये तुफान वृष्टी झाली. त्यात २९०० हेक्टरवरील गहू, मका, कांदा,ज्वारी, आंबा, मोसंबी, द्राक्षे व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात अहमदनगरपाठोपाठ सर्वात जास्त नुकसान अकोला भागात झाल्याचा महसूल विभागाचा अंदाज आहे.
महसूल विभागाकडून अकोला, बार्शी टाकळी, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर तालुक्यात पंचनामे सुरू आहेत. तेथील सहा हजार हेक्टरवरील लिंबू, भुईमुग, कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांची हानी झाल्याचा अंदाज आहे.
बुलडाण्याच्या मोताळा, खामगाव, बुलडाणा भागातील मका, गहू, हरभरा, रब्बी ज्वारीसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. तेथील एकूण १२०० हेक्टरच्या आसपास पिके भुईसपाट झाल्याचा अंदाज आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसानीचे चित्र
नुकसान कशामुळे झाले ः गारपीट, वादळी वारे, अतिवृष्टी
नुकसानग्रस्त जिल्हे ः रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, गोंदिया, वर्धा
७ व ८ एप्रिल या दोन दिवसांत झालेले नुकसान ः ३५ हजार हेक्टर.
९ एप्रिल रोजी झालेले नुकसान ः १५ हजार हेक्टरच्या पुढे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.