
Dhule News : कृषी विभाग तसेच विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे, अशा ठिकाणी संयुक्तरीत्या पीक परिस्थितीची पाहणी करावी.
पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात पशुधनासाठी पुरेसा वैरण चारा उपलब्ध होण्यासाठी तसेच चारा छावणीची गरज भासल्यास आतापासून पुरेसा चारा, चारा बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. अवैध पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
पावसाअभावी जिल्ह्यातून दुष्काळीस्थिती जाहीर करण्याची मागणी रेटली जात आहे. याअनुषंगाने टंचाई स्थितीबाबत जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठक झाली.
निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, महापालिका उपायुक्त विजय सनेर, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. आर. एम. शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. व्हट्टे, कार्यकारी अभियंता एस. बी. पढ्यार, तसेच तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
रोहयो कामे सुरू करा
टंचाईग्रस्त गावातील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित पूर्ण करावीत. कृषी व रोहयो विभागाने कमी पर्जन्यमान झालेल्या गावांमध्ये फळबाग, शेततळे तसेच रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत.
महापालिकेने अक्कलपाडा धरणातून शहरासाठी पाणीपुरवठा सुरू करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे.
पाणीपुरवठा करणारे टँकर सुस्थितीत ठेवून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात. त्याचबरोबरच दुष्काळी स्थितीसंदर्भात आराखडा तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी यंत्रणेला दिली. सर्व संबंधितांनी आपापल्या विभागाची माहिती बैठकीत दिली.
आतापासून नियोजन करावे
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पर्जन्यमान न झाल्यामुळे येत्या काळात टंचाईसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासून सर्व विभागांनी नियोजन करावे. पाटबंधारे विभागाने धरणातील साठा लक्षात घेऊन शेती, सिंचन क्षेत्र, तसेच पिण्याच्या आरक्षित पाणीवाटपाचे नियोजन करावे.
आवश्यक असेल अशा ठिकाणी पाटचारी, कॅनॉलची दुरुस्ती करावी. पीक परिस्थिती व संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने संबंधित तहसीलदारांनी स्थितीची पाहणी करावी. तालुकास्तरावर टंचाई समितीची स्थापना करून टंचाई समितीच्या बैठकीचे आयोजन करावे. संभाव्य पाणीटंचाईग्रस्त तसेच दुष्काळसदृश भागात टॅंकरने तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी जवळच्या जलस्रोतांचा शोध घेऊन नियोजन करावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.