
Ratnagiri News : गेल्या तीस वर्षांत वानर, माकडांची संख्या १०० पटीने वाढली आहे. शेती, बागायतीचे उत्पन्नच मिळाले नाही तर कोकणात शेतकरी जगू शकत नाही. या वेळी वानर, माकडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, असा एकमुखी ठराव बुधवारी (ता. २) शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.
यासंबंधीचा ठराव १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत करून ते शासनाकडे पाठवण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला. तसेच पावसाळी अधिवेशनात यावर तोडगा काढा, अन्यथा महिनाभरात साखळी उपोषण करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. १) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. कायद्याचे भय दाखवू नका. कायदा जनतेसाठीच आहे. त्यामुळे सुरक्षित व भयमुक्त शेतीचा आमचा अधिकार आहे तो मिळावा याकरिता शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार आजच्या सभेत करण्यात आला.
वानरांचा बंदोबस्त करा अन्यथा महिन्याभरात उपोषणाला बसू, असे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व वन विभागाला सर्व शेतकऱ्यांनी वैयक्तिक नेऊन दिली. गोळप येथील अविनाश काळे यांनी गतवर्षी वानर, माकडांच्या बंदोबस्तासाठी उपोषण केले. त्यानंतर माकडांचा प्रश्न विधानसभेत पोहोचला. त्यावर समितीही गठीत झाली. मात्र निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर बैठकीला २०० हून अधिक शेतकरी, आंबा बागायतदार उपस्थित होते.
काळे म्हणाले, की पूर्वी वानरांची शेपटी दाखवा ५ रुपये मिळवा, अशी शासनाची योजना होती. परंतु नंतर कायदे आले व वानरांना संरक्षण मिळाले. परंतु ३५ वर्षांत वानरांची संख्या १०० पटीने वाढली आहे. कोणतीही शेती करण्यास शेतकरी घाबरतात. ही गोष्ट शासनाला कळत नाही.
आमच्याकडे तक्रारी येत नाहीत, असे शासनाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे प्रत्येक गावातून समस्यांची निवेदने पाठवली पाहिजेत. शेती करता येत नसल्याने उत्पन्न नाही, ही शासनाचीच जबाबदारी आहे. भरपाई हा इलाज नाही. वानरांचा बंदोबस्त झाला पाहिजे. सचिन काळे, दिलीपकुमार साळवी, विनायक ठाकूर, दशरथ रांगणकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरा ः साळवी
शेतकरी सभेत आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी म्हणाले, की सरकार कधीच न्याय देत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार, शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी भांडले पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे. या प्रश्नाला वाचा फोडू या व सरकारला जाग आणू या. प्रवीण जोशी यांनी शेतकरी संघटना स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. तर सचिन लिंगायत यांनी आपल्या बागेत १३५ वानर मोजल्याचे सांगितले.
एकाच ठिकाणी एवढी वानरे असतील तर शेती अशक्यच आहे. त्रासामुळे राखणीसाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याचे सांगितले. प्राणीमित्र साप, घोरपड किंवा पक्ष्यांना पकडून नेतात. मग शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वानरांना का पकडून नेत नाहीत, असा सवाल सागर माईंगडे यांनी केला.
पेटा व प्राणीविषयक कायद्यात बदल करण्याकरिता केंद्राकडे पाठपुराव्याची गरज असल्याचे मत दिलीप पटवर्धन यांनी व्यक्त केले. मुनाफ खतीब म्हणाले, की जनता दरबारात वानरांचा प्रश्न मांडला परंतु मंत्र्यांनी दखल घेतली नाही. नंतर अधिवेशनात आमदार योगेश कदम, शेखर निकम आदींनी प्रश्न उपस्थित केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.