
ॲग्रोवन वृत्तसेवा
Crop Damage : मुंबई ः नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनाम्यांच्या पद्धतीत सुधारणा करून मोबाईल ॲपद्वारे पंचनामे करावेत. त्यासाठी ‘एमआरएसएसी’ (MRSC) या कंपनीस नियुक्त केले आहे.
या कंपनीमार्फत केल्या जाणाऱ्या ई-पंचनाम्यानुसार १५ दिवसांत बाधितांना नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) मिळाली पाहिजे. तशी व्यवस्था तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे सोमवारी (ता. २९) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे. पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीत राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा खर्च, कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे, कोविड व विविध प्रसंगी करण्यात आलेल्या बचाव कार्याचा खर्च, ई-पंचनामे, आपदा मित्र, ई-सचेत प्रणाली आदी मुद्द्यांवर मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी सादरीकरण केले.
राज्यात कोकण विभागास वारंवार वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच ३२०० कोटी रुपये कोकणात विविध आपत्ती निवारण कामे करण्यासाठी मंजूर केले आहेत.
त्यातून भूमिगत वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळामधले आसरे बांधणे, दरडी प्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय, वीज अटकाव यंत्रणा आदी कामे करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
कोविडसाठी अर्थसाहाय्य
कोविड कारणांसाठी आजपर्यंत १ हजार ९७४ कोटी खर्च झालेला आहे. कोविड काळात झालेल्या मृत्यूंसाठी एकूण १०३८ कोटी रुपये मदत व पुनर्वसन विभागाने अनुदान वाटप केले आहे. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकास ५० हजार रुपये राज्य शासनाने देण्याचे निश्चित केले होते.
अजूनही पाच हजार प्रकरणे प्रलंबित असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
आपत्तींमुळे ४३७ मृत्युमुखी
मागील वर्षात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे ४३७ जण मरण पावले असून ६८० जखमी झाले आहेत. तर ४३४८ जनावरे मरण पावली, अशी माहितीही विभागाने बैठकीत दिली.
७९०० आपदा मित्रांना प्रशिक्षण दिले असून राज्याला यासाठी २७ कोटी रुपये निधी मिळाला आहे.
मदतीसाठी निधी
‘एसडीआरएफ’मध्ये केंद्राकडून प्राप्त निधी आणि तितकाच राज्याचा हिस्सा असे यावर्षी म्हणजे २०२२-२३ मध्ये ३ हजार ९४७ कोटी प्राप्त झाले. ‘एसडीआरएफ’च्या निकषांव्यतिरिक्त एकूण खर्च ३ हजार ८६३ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाला आहे.
तसेच जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने शेतकऱ्यांना ७ हजार १५१ कोटी २५ लाख वाटप केल्याचेही सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.