राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर ः यंदाचा हंगाम सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्यांदाच साखर उत्पादन (Sugar Production) पिछाडीवर पडले आहे. १५ मार्च अखेर देशात २८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत २८४ लाख टन साखर तयार झाली होती.
प्रमुख साखर उत्पादक राज्य असणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात तब्बल एक महिना हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. याचा परिणाम देशातील साखर उत्पादन घटण्यावर होत आहे.
यंदा देशातील ५१६ साखर कारखान्यांनी यंदा हंगाम सुरू केला होता. या पैकी १९४ साखर कारखान्यांनी हंगाम संपवला आहे. ३३६ साखर कारखान्यांचे गाळप अजून सुरू आहे. या कालावधीत महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक साखर उत्पादन केले आहे.
राज्यात १०१ लाख टन साखर तयार झाली आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेशात ७९ लाख टन साखरेची निर्मिती करण्यात आली. कर्नाटकात ५३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ७८ साखर कारखाने बंद झाले होते.
फेब्रुवारी अखेर पर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन काहीसे अधिक होते. मार्चमध्ये मात्र ही परिस्थिती बदलली.
साखर उत्पादन करणाऱ्या सर्वच राज्यामध्ये यंदा जलद गतीने साखर कारखाने बंद होत आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या वेळी पावसामुळे सर्वच कारखान्यांचे गणित विस्कटले. हंगामाच्या प्रारंभी यंदाही उच्चांकी साखर उत्पादन होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र डिसेंबर पासूनच उसाच्या एकरी उत्पादनात व उसाच्या रिकव्हरीमध्ये घट संपूर्ण देशात दिसून आली. उत्तर प्रदेशामध्ये तर गेल्या दोन वर्षांमध्ये साखर उत्पादन कमी प्रमाणात होत आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्राने उच्चांकी उत्पादन घेत देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. सध्याच्या हंगामाची आकडेवारी पाहता यंदाही महाराष्ट्र देशात साखर उत्पादनात अव्वल ठरणार आहे.
असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन किमान १० ते १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राने साखर उत्पादनात शतकी मजल मारली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात १०९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
तुलनेत उत्तर प्रदेशचे उत्पादन ७९ लाख टनापर्यंतच रखडत आहे. गेल्या वर्षीही उत्तर प्रदेशात खूपच धीम्या गतीने साखर उत्पादन झाले.
कर्नाटकातही गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन लाख टनानी घट आहे. कर्नाटकात ५३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.
तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड व ओडिसा या राज्याचे एकत्रित उत्पादन ४६ लाख टनाचे झाले आहे.
इथेनॉलकडे साखर वळविण्यात उत्तर प्रदेश आघाडीवर
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इथेनॉलकडे साखर वळविण्याच्या प्रमाणात चांगली वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत २५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात आली होती.
यंदा ३१ लाख टन साखर इथेनॉल कडे वळविण्यात आली आहे. इथेनॉलकडे साखर वळविण्यात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेशने १५ मार्चपर्यंत ११ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली आहे. गेल्या वर्षी नऊ लाख टन साखर कितना कडे वळविण्यात आली होती.
महाराष्ट्राने ९.७ लाख तर कर्नाटकाने ९.२ लाख टन साखरेपासून इथेनॉल तयार केले आहे. त्याचाही परिणाम साखर उत्पादन कमी होण्यावर झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.