कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख टनांकडे गतीने होत आहे. १५ एप्रिल अखेर देशात २९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. येत्या काही दिवसांत साखर उत्पादनाचा आकडा ३०० लाखांचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. देशात अजूनही १७० साखर कारखान्यांचा हंगाम सुरू असल्याने यंदाचा हंगाम विक्रमी उत्पादकतेचा ठरणार हे निश्चित होत आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २४८ लाख टन उत्पादन झाले होते. यात यंदा ४२ लाख टनांची भर पडली आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात ‘शेकडा’ एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्याअखेर महाराष्ट्र व उत्तरप्रदेशच्या राज्यांनी साखर उत्पादनाचा शेकडा पार केला आहे. महाराष्ट्रात १०४, तर उत्तर प्रदेशात १०० लाख टनांहून अधिक उत्पादन झाले आहे. दोन्ही राज्यांत अजूनही हंगाम सुरू असल्याने साखर उत्पादनात अपेक्षित असणारी मोठी वाढ प्रत्यक्षात येत आहे. देशाच्या उत्पादनात तीन चतुर्थांश वाटा असणाऱ्या या दोन्ही राज्यांत अद्याप गाळप सुरू आहे.
कर्नाटकासह बिहार, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा आदी राज्यांचा पूर्ण हंगाम आटोपला आहे. तमिळनाडू, गुजरातचा हंगाम येत्या पंधरा दिवसांत संपेल, अशी शक्यता सूत्रांची आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यात मात्र हंगाम आणखी पंधरा दिवसांहून अधिक काळ चालेल यामुळेच साखर उत्पादनात आणखी भर पडणार आहे
गतवर्षीपेक्षा तीस कारखाने अधिक सुरू गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या कालावधीपर्यंत तीस अतिरिक्त कारखाने सुरू आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत १४० कारखाने सुरू होते. यंदा १७० कारखाने सुरू आहेत. यामुळेच साखर उत्पादनाची गती गेल्या वर्षीपेक्षा अधिक असल्याची माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली.
राज्यनिहाय साखर उत्पादन १५ एप्रिल अखेर (लाख टन) | |
महाराष्ट्र | १०३.९५ |
उत्तर प्रदेश | १००. ८६ |
कर्नाटक | ४१.४५ |
तमिळनाडू | ५.८५ |
गुजरात | ९.५० |
इतर राज्ये | २९. ३० |
(आकडेवारी स्रोत---इस्मा) |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.