
चंद्रपूर : कोविड लसीकरण (Covid Vaccination) अमेरिकेत अजून पूर्ण झाले नाही. चीनमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मात्र, कोरोनाची चाहूल लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टास्क फोर्स स्थापन करून अवघ्या ९ महिन्यांत कोरोनाच्या दोन लसी निर्माण केल्या. भारतात २४० कोटी लसीचे डोस दिले गेले. कॉंग्रेसचे नेते अशिक्षित आहे. त्यामुळे त्यांच्या सत्तेत टीबीची लस (TB Vaccine) देशात येण्यास २५ वर्षे लागली. पोलिओ २८, तर जापनीज मेंदूज्वरची लस देण्यास तब्बल १०० वर्षे लागली, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आखण्यात आलेल्या मिशन-१४४ अंतर्गत आज (ता.२) पहिली विजय संकल्प सभा चंद्रपुरात झाली. त्यावेळी नड्डा बोलत होते. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, आमदार बंटी भांगडिया आदींची उपस्थिती होती.
यावेळी मोदींच्या काळात झालेल्या विकासकामांचा पाढा नड्डा यांनी वाचला. जग आर्थिक संकटात सापडले आहे. या विपरीत परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला समोर नेत आहे. दोनशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनसह रशिया, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला भारताने मागे टाकले आहे. भारतीच अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची आहे. स्टील उत्पादन, मोबाईल निर्मिती, फार्मास्युटिकल, केमिकल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये चौफेर प्रगती केली आहे.
मोदींच्या नेतृत्वात देशातील गरीबी एक टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. देशातील ८० टक्के नागरिकांना मोफत अन्नधान्य दिले जाते. त्याचा हा परिणाम आहे. जे अमेरिका, युरोप करू शकले नाही ते मोदींच्या नेतृत्वात भारताने करून दाखवले. युक्रेन-रशियाचे युद्ध सुरू असताना मोदींनी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांना फोन करून युद्ध थांबवले आणि ३२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी परत आणले, असाही दावा नड्डा यांनी केला.कॉंग्रेसला भारतातील नागरिकांच्या दुःखाची माहिती नाही. मोदींनी देशातील १२ कोटी परिवाराला शौचालय दिले. लोकांची अब्रू वाचविली.
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राची प्रगती होत आहे. मोदींनी महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यावेळी नड्डा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरसुद्धा टीका केली. सत्तेच्या मोहात आमच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात उद्धव ठाकरे गेले.
आम्ही युतीत लढलो. परंतु, निकालानंतर ठाकरे यांच्यात सत्तेची लालसा निर्माण झाली, असे ते म्हणाले. उज्ज्वला, प्रधानमंत्री सन्मान, किसान मानधन योजनांमुळे लोकांचे आयुष्यमान बदलले. आयुष्यमान भारत जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. ठाकरे यांच्या काळात भ्रष्टाचार वाढला होता. टक्केवारीत तीन पक्ष वाटेकरी होते. देशाच्या विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. काश्मीर ते कन्याकुमारी विजय संकल्प आम्ही केला आहे. या विजयाची सुरुवात चंद्रपुरातून होईल, असे जे.पी. नड्डा म्हणाले. सभेचे संचालन आणि आभार भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.