Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता. ४) दुपारी दोन नंतर अनेक तालुक्यांत झालेल्या वादळी वाऱ्यासह मध्यम केळी, लिंबू, आंबा, पपई आदी फळबागांना जोरदार तडाखा बसला आहे.
आखाडे, घरावरील पत्रे उडून गेले. सौर पंप मोडून पडले. ऊस आडवा झाला. कडब्याच्या गंजीचे नुकसान झाले.हाती आलेल्या केळी बागा नैसर्गिक संकटामुळे उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३६ मंडलांत सोमवारी (ता. ५) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. पाथरी, सेलू, जिंतूर, परभणी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा आदी तालुक्यांतील अनेक गावांना वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे.
घडे लगडलेल्या अवस्थेतील केळींच्या बागा मोडून पडल्या. येत्या पंधरा दिवस ते महिनाभरात काढणीस येणाऱ्या केळी अवघ्या काही तासात उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापनावर केलेला खर्च वाया गेला आहे. एकट्या पाथरी शिवारातील ५० शेतकऱ्यांच्या ६० एकरावरील केळी बागांचे वादळांमुळे नुकसान झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. जिंतूर, सेलू, पालम तालुक्यांतील अनेक मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडलांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यात पावसाचा जोर होता.
केळी, आंबा आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले.आजरसोंडा (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकरी मनोज आहेर यांच्या शेतातील सौर कृषिपंपाच्या प्लेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.