
Wardha News : गत पंधरवड्यापासून सुरू असलेल्या गारपिटीसह वादळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातले असून १०८ गावांना याचा फटका बसला आहे. ३०४ कुटुंब बाधित झाली असून, ७५ लहान-मोठ्या जनावरांचा यात मृत्यू झाला आहे.
यंदाचे वर्षच शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरले आहे. सुरुवातीला पावसाळ्यात अतिवृष्टीने जमीन खरडून निघाली होती. तर रब्बी हंगामात ऐन काढणीच्या वेळेला पावसाने हजेरी लावल्याने हाती आल्याने होत्याचे नव्हते झाले.
ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था होती त्यांनी उन्हाळी पीक म्हणून भुईमूग, उन्हाळी सोयाबीनसह भाजीपाला पिकाची लागवड केली. मात्र गत पंधरवड्यापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होत आहे.
जिल्ह्यात सात तालुक्यातील १०८ गावांना पावसाचा फटका बसला आहे. यात ३०४ कुटुंबे बाधित झाली आहेत. दोन घरे पूर्णतः ढासळले असून २७५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.
यात सर्वाधिक फटका देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्याला बसला आहे. झालेल्या नुकसानीची कृषी आणि महसूल विभागाकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
३२ गोठ्यांचे नुकसान
वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे ठिकठिकाणी ३२ गोठ्यांचे नुकसान झाले. ७५ जनावरांचा मृत्यू झाला. तर आठ जनावरे गंभीर जखमी झाली आहेत.
दीडशे हेक्टर क्षेत्राचे नुकसान
गत पंधरवड्यापासून सुरू असलेल्या गारपिटीमुळे देवळी, सेलू, हिंगणघाट, आर्वी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेल्यांमध्ये २.५ हेक्टर, देवळी तालुक्यात ३९.६० हेक्टर, आर्वी तालुक्यात ८२ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात ३३.६१ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे.
तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान ३.३० हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. यात समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यांचा समावेश आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.