
Nagpur News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेअंतर्गत रेशीम लागवडीसाठीच्या अनुदान प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता पूर्वी तहसीलदारांद्वारेच दिली जात होती. आता मात्र पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना देखील हे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. शासनाने बुधवारी (ता.५) या संबंधीचा आदेश काढला. या निर्णयामुळे राज्यात येत्या काही वर्षात तुती लागवड क्षेत्र एक लाख एकरावर पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
राज्यात रेशीम शेतीला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. मनरेगातून याकरिता रेशीम उद्योग विकास योजना या नावाने अनुदान योजनाही राबविण्यात येते. त्यामध्ये तुती लागवड ते रेशीम शेड उभारणी अशा विविध टप्प्यांत अनुदान देण्याची तरतूद आहे. यासाठीची प्रशासकीय मान्यता सध्या तहसीलदारस्तरावर, तर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता रेशीम संचालनालयाकडून देण्याची पद्धत आहे. मात्र या मान्यतेत बराच वेळ खर्ची होत असल्याने योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.
त्यामुळे प्रशासकीय मान्यतेचे अधिकार विकेंद्रित करावे, अशी मागणी होत होती. रेशीम संचालनालयाचे संचालक गोरक्ष गाडीलकर तसेच उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी या संदर्भाने पाठपुरावा केला.
त्यामुळे आता पंचायत समिती कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही मनरेगातून तुती लागवडीच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तुती लागवडीसाठी कमीत कमी एक एकर व जास्तीत जास्त पाच एकर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. लागवड क्षेत्र कितीही असले तरी ५० फूट लांब व २२ फूट रुंद कीटक संगोपनगृहास अनुदान देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीअंतर्गंत असलेल्या प्रत्येक महसुली गावात २४ तास अर्ज करण्याची सुविधा राहणार आहे. त्याकरिता अर्ज पेटी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या पेटीमध्ये इच्छुक लाभार्थ्याने अर्ज टाकावा, असे अपेक्षित आहे. अर्ज पेटी दर सोमवारी (ता.११) उघडण्यात येईल. अर्ज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या डाटा
एंट्री ऑपरेटर, ग्रामरोजगार सेवक यांच्या मदतीने होईल. लाभार्थ्यांनाही वैयक्तिकस्तरावर थेट ऑनलाइन अर्ज करता येईल. ग्रामपंचायत, ग्रामसभेच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुती लागवडीचे कार्य होणार आहे. या माध्यमातून रेशीम शेतीचा विस्तार होईल, अशी अपेक्षा असून, त्यामुळेच येत्या पाच वर्षांकरिता तुती लागवड लक्ष्यांक एक लाख एकर निश्चित करण्यात आले आहे.
पौष्टिक चारा म्हणूनही उपयोग
दुधाळ तसेच शेळ्यांसाठी तुतीचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. यामध्ये २५ टक्के प्रथिने असतात. त्यामुळे दुधाच्या फॅटमध्ये वाढ होते, अशी माहिती रेशीम संचलनालयाच्या वतीने देण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.