
Sugarcane Season Update कोल्हापूर ः राज्यात गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season) समाप्तीचा वेग वाढला आहे. १२ मार्चअखेर ६४ साखर कारखाने (Sugar Mills) बंद झाले आहेत.
गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ १२ कारखाने बंद झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५२ साखर कारखाने लवकर बंद झाले आहेत.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात गतीने साखर कारखाने बंद होत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत कूर्मगतीने ऊसगाळप व साखरनिर्मिती झाली. प्रत्येक साखर कारखान्याचा वेग हळूहळू कमी होत आता हंगाम समाप्ती होत आहे.
सोलापूर विभागात हंगाम सुरू केलेल्या ५० कारखान्यांपैकी ३० कारखाने बंद झाले. त्या खालोखाल कोल्हापूर विभागात ३६ पैकी १२ कारखान्यांचा हंगाम आटोपला.
शेवटच्या टप्प्यात या कालावधीतील गाळपामध्ये सोलापूर व कोल्हापूर हे राज्यात अव्वल ठरले आहेत. या विभागांतून प्रत्येकी २२७ लाख टनांपर्यंत उसाचे गाळप झाले.
कोल्हापूर विभागाचा उतारा ११ टक्क्यांवर असल्याने कोल्हापूर विभागाने साखर उत्पादनात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात २५९ लाख क्विंटल झाले आहे. त्या खालोखाल पुणे विभागाने २१५ लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली.
राज्यात सर्वांत कमी साखर उत्पादन नागपूर विभागात केवळ ३ लाख क्विंटल झाले. यंदाच्या हंगामात शेवटपर्यंत उतारा १० टक्क्यांवर गेला नाही. गेल्या वर्षी या कालावधीत १०.३६ टक्के साखर उतारा होता. यंदा तो कसातरी ९.९४ टक्क्यापर्यंत गेला.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात पूर्णपणे निराशेचे वातावरण होते. यातील काही कारखान्यांना या टप्प्यात अन्य ठिकाणांहून ऊस उपलब्ध करण्याची वेळ आली.
शेवटच्या एका महिन्यामध्ये अनेक कारखान्यांनी शिफ्टची संख्याही कमी केली. त्यामुळे ऊसगाळप व साखरनिर्मितीवरही त्याचा परिणाम झाला. रविवारअखेर (ता. १२) १०१४ लाख टन उसाचे गाळप झाले.
गेल्या वर्षी याच कालावधीत १०३५ लाख टन गाळप झाले होते. यंदा या कालावधीत १००८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
गेल्या वर्षी हेच उत्पादन १०६९ लाख क्विंटल होते. अंतिम टप्प्यात कारखान्यांना उसासाठी धावपळ करावी लागत असल्याने साखर निर्मितीवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला.
सोलापूर, कोल्हापूर विभागांतील कारखाने तर १५ फेब्रुवारीपासूनच बंद होण्यास प्रारंभ झाले होते. शेवटचा एक महिना बहुतांश कारकारखान्यांनी निम्म्या गाळपावरच चालवला. त्यामुळे साखरनिर्मितीत मोठी घट झाली.
औरंगाबाद, पुणे, नगर विभागांतील कमी कारखाने बंद
हंगाम अंतिम टप्प्यात येत असला तरी औरंगाबाद व पुणे विभागातील साखर कारखाने इतर विभागांच्या तुलनेत कमी प्रमाणात बंद होत आहेत. या विभागांत मजूर टंचाईमुळे ऊस तोडणी शिस्तीत होत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र यंदा परिस्थिती फारशी बिकट नसल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद, पुणे, नगर विभागांतील बहुतांश कारखाने एप्रिलच्या पहिल्या सप्ताहापर्यंत बंद होतील, अशी शक्यता आहे.
गळीत हंगामाची १२ मार्चअखेरची स्थिती
विभाग हंगाम घेतलेले कारखाने बंद कारखाने
कोल्हापूर ३६ १२
पुणे ३२ ५
सोलापूर ५० ३०
अहमदनगर २७ ७
औरंगाबाद २६ १
नांदेड २९ ७
अमरावती ४ २
नागपूर ४ -
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.