
Amravati News : ‘‘अर्थ, कृषी यासारख्या मंत्रीपदाकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दबावाची रणनीती अवलंबिण्यात आली. अजित पवार गटाची ही खेळी यशस्वी झाली असून हीच बाब आता एकनाथ शिंदे गटासाठी धोक्याची घंटा आहे. त्यातच मंत्रिपदासाठी भुकेले असलेले भाजपचे अनेक आमदार उपाशीच राहिले,’’ असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांनी हाणला आहे.
शनिवारी (ता.१५) सायंकाळी ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. या वेळी हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुनील वऱ्हाडे, संगीता ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘‘भाजपच्या १०५ पैकी मोजक्याच आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे. मात्र बाहेरून येणाऱ्यांना पहिल्या पंगतीत बसविले जात आहे. याच कारणामुळे भाजप आमदारांच्या गोटात अस्वस्थता आहे.
खऱ्या अर्थाने पहिल्या पंगतीचे मानकरी असलेले भाजप आमदारच या धोरणामुळे उपाशी राहिले आहेत. शिंदे गटातील आमदारांमध्ये देखील अजित पवार गटाच्या सहभागामुळे चिंता वाढली आहे. अनेकांना मंत्रिपदाचे गाजर दाखविण्यात आले. परिणामी त्यांचेही बंड येत्या काळात नाकारता येत नाही.’’
‘‘राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही, हे दीड वर्षांपूर्वी कळाल्याने भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे. एकनाथ शिंदेसारखाच प्रयोग आता ‘राष्ट्रवादी’मधील काही नेत्यांसोबत केला आहे. राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याऐवजी दुसरे पक्ष पोखरण्याचे काम सुरु आहे’’, असा टोला देशमुख यांनी लगावला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.