
नगर : एसटी महामंडळाच्या (MSRTC) अहमदनगर विभागाने दिवाळीनिमित्त १० दिवस जादा बसचे नियोजन केले होते. या १० दिवसांत महामंडळाने आठ कोटी ९५ लाख ८८ हजार रुपयांचे उत्पन्न (MSRTC Income) मिळविले. कोविड व एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच एसटी महामंडळाला मोठे उत्पन्न मिळविता आले.
कोविड संकटकाळानंतरची ही पहिलीच खुली दिवाळी असल्याने नागरिकांनी ती उत्साहात साजरी केली. दिवाळीच्या सुट्ट्यांत गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. गर्दी पाहता, विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिवाळीतील दहा दिवसांच्या वाहतुकीचे नियोजन केले. त्यानुसार २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ९५ जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. या बसगाड्यांनी २३ लाख किलोमीटरचा प्रवास केला.
सुरक्षित प्रवासासाठी अनेकांनी एसटी महामंडळालाच प्राधान्य दिले. त्यामुळे एसटी बसना तोबा गर्दी होती. २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्याने अनेकांनी प्रवास टाळला. तो दिवस वगळता उर्वरित ९ दिवसांत बस स्थानकांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वाढती गर्दी पाहता, विभाग नियंत्रक सपकाळ स्वतः बस स्थानकात बसून होत्या.
त्यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणखी जादा बसचे नियोजन केले होते. या गर्दीचा सकारात्मक परिणाम एसटीच्या उत्पन्न वाढण्यात झाला आहे. बुधवारी (ता. ९) शाळा सुरू होणार असल्याने, आपापल्या गावी गेलेले चाकरमाने आता शहरात परतू लागले आहेत. त्यामुळे बसना गर्दी आहे. मात्र दोन ते तीन दिवसांत ती ओसरणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यात्रा बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय झाला असून, शनिवारी (ता. १२) अष्टविनायक यात्रेसाठी बस निघणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.