
पुणे ः अहमदनगर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी काशिनाथ चेंडू खोले (Kashinath Chendu Khole) या शेतकऱ्यांने सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वोच्च शिखर कळसुबाई (Kalsubai Mountain) सर करीत अॅग्रोवनचा दिवाळी अंक झळकवला. ‘समस्यांचे सर्व डोंगर पार करण्याची आणि शेतशिवारातील प्रगतीची शिखरं गाठण्याची प्रेरणा आम्हाला ‘अॅग्रोवन’मधून मिळते,’ अशी निर्मळ भावना श्री. खोले यांनी यावेळी व्यक्त केली.
नाशिक व नगर जिल्ह्यात पसरलेल्या हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगांमध्ये गेल्या पाच दशकांपासून श्री. खोले कष्टाची शेती करतात. अॅग्रोवनचे ते वाचक आहेत. ५९ वर्षांचे असतानाही शेतीमधील कोणत्याही समस्येशी झुंज देत नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करीत दर्जेदार उत्पादन घेण्यात ते आघाडीवर असतात. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवर शेती व ग्रामविकासात काम करणाऱ्या ‘बायफ’ या स्वयंसेवी संस्थेसोबत विविध प्रयोगांमध्ये भाग घेतात.
‘‘अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. यंदाचा दिवाळी अंक ‘आम्ही स्वयंसेवी’ या विषयाला वाहिलेला आहे. चांगल्या स्वयंसेवी संस्थेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात कशी क्रांती होते, या प्रत्यक्ष मी साक्षीदार आहे. त्यामुळेच कळसुबाई शिखर सर करीत तेथे सूर्योदयाला दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्याचा संकल्प मी केला. रविवारी (ता. १७) मी तो पूर्ण केला. त्यासाठी आठ तास चालावे लागले,’’ अशी माहिती श्री. खोले यांनी आनंदाने दिली.
पेंडशेत गावात श्री. खोले यांची १२ एकर शेती आहे. त्यांनी भाताच्या ५२ वाणांचा संग्रह केला आहे. त्यांनी कळसुबाई शिखराकडे जाण्यासाठी मध्यरात्री तीन वाजेपासून तयारी सुरू केली. कडाक्याच्या थंडीत अंघोळ करीत त्यांनी जनावरांना वैरणपाणी दिले. त्यानंतर धारा काढल्या.
ग्रामदैवताचे दर्शन घेत त्यांनी भल्या पहाटे कळसुबाई पायथ्याकडील पाण्याचा ओढा पार केला. सलग साडेतीन तास चढाई करीत ते शिखरावर पोहोचले. शिखराकडे जाण्यासाठी दक्षिण बाजूच्या जुन्या वाटेचा वापर केला. विशेष म्हणजे आठ तासाची मोहीम पूर्ण करीत ते पुन्हा शेतात गेले व दिवसभराची कामे करून सायंकाळी घरी परतले.
कळसुबाईचे दर्शन घेत श्री. खोले व त्यांच्या सहकारी भात उत्पादक शेतकऱ्यांनी अॅग्रोवनचा दिवाळी अंक शिखरावर झळकवला. प्रसिद्ध राजूर पेढा वाटून आनंद व्यक्त केला. शिखरावरील माकडांना मनोभावे खाऊ वाटला. ‘‘कळसुबाई शिखराच्या घेऱ्यात असलेल्या गावांना प्रगतीसाठी झुंज द्यावी लागते. मात्र, सह्याद्री पर्वतरांगांमुळे पर्यटकांचे लक्ष या भागाकडे वेधले जात आहे.
पर्यटन,वन आणि कृषी खात्याने संयुक्त प्रयत्न केल्यास पर्यटन हा चांगला जोडधंदा आमच्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी शिखराकडे जाणाऱ्या पेंडशेत वाटेचा विकास करणारा प्रकल्प वनखात्याने राबवावा,’’ अशी अपेक्षा श्री. खोले यांनी यावेळी व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.