Agriculture In Crisis : इसापूर वन्यजीव अभयारण्यालगतची शेती संकटात

Wild Animal Crop Damage : विदर्भ मराठवाडा सीमारेषेवरील इसापूर वन्यजीव अभयारण्यासाठी जमिनी अधिग्रहित करण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांचे अरण्यरुदन सुरू आहे.
Isapur Sanctuary
Isapur Sanctuary Agrowon

Yavatmal News : विदर्भ मराठवाडा सीमारेषेवरील इसापूर वन्यजीव अभयारण्यासाठी जमिनी अधिग्रहित करण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांचे अरण्यरुदन सुरू आहे. अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या २२० हेक्टर शेतजमिनी पडीक पडल्या आहेत. अभयारण्याला लागून असलेल्या शेतीचे वन्यप्राणी नुकसान करीत असल्याने आर्थिक अरिष्ट कोसळले आहे.

पुसद तालुक्यातील इसापूर वन्यजीव अभयारण्याची अधिसूचना महाराष्ट्र शासनाने २७ ऑगस्ट २०१४ रोजी जाहीर केली. वन्यजीवांसाठी हा परिसर आरक्षित करण्यात आला. जलसंपदा विभागाने ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पासाठी ६३७ हेक्टर जमीन क्षेत्र आधीच संपादित केलेले आहे. यात सातेफळ, अनसिंग, पाचकुडूक, सुकळी, गौळमांजरी, जामनाईक या गावांच्या जमिनीचा समावेश आहे.

Isapur Sanctuary
Wild Animal Crop Damage : वन्यप्राण्यांकडून पीक नुकसानीचे काय?

अभयारण्याच्या जंगलाला लागूनच जामनाईक, अनसिंग, सुकळी, गौळमांजरी, पाचकुडूक, उटी, इसापूर येथील शेतकऱ्यांच्या खासगी २२० हेक्टर शेतजमिनी अभयारण्यासाठी अधिग्रहित करणे आवश्यक आहे. एकूण ८५७.४ हेक्टर आर. अधिसुचित क्षेत्राचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांनी वनखात्याला कळविला आहे.

इसापूर वन्यजीव अभयारण्याची अधिसूचना जाहीर झाल्यापासून आजतागायत सात वर्षे लोटली आहेत. परंतु अधिग्रहणा संदर्भात कुठलाही निर्णय अद्यापि घेण्यात आलेला नाही. या जंगलात रानडुक्कर, रोहींचे मोठे कळप आहेत.

Isapur Sanctuary
Wild Animal Crop Damage : वानर, माकडांचा बंदोबस्त करा, अन्यथा उपोषण

काही शेतकऱ्यांनी शेतात पीक घेण्याचा प्रयत्न केला असताया पिकांची प्रचंड नासधूस करण्यात येते. अभयारण्यामुळे या भागात रस्ते नाहीत, वीज नाही, वन्य प्राण्यांचा प्रचंड त्रास, शेतीत काम करण्यासाठी शेतमजूर उपलब्ध नाहीत, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे. अभयारण्यामुळे ‘शेती करता येईना, पोट भरता येईना’ अशी स्थिती झाली आहे.

अभयारण्यामुळे शेतकऱ्यांची झालेली ही दैन्यावस्था वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही कानावर घालण्यात आली आहे. तसेच तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचीही पीडित शेतकऱ्यांनी भेट घेतली. उपविभागीय अधिकारी तसेच वन अधिकारी यांच्याशी वेळोवेळी बैठकी पार पडल्या. परंतु, शेतजमीन अधिग्रहणाचा प्रश्न काही सुटलेला नाही. यासंदर्भात प्रधान वनसंरक्षक वन्यजीव महीप गुप्ता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सुरोशे कुटुंबांची ५५ एकर शेती आहे. वन्य जीवांच्या भीतीमुळे २७ एकर जमीन पडीक आहे. रोहींच्या झुंडी शेतात केव्हा शिरतील याचा नेम नाही. रात्री बॅटरी घेऊन उभे राहावे लागते. रानडुकरे केव्हा हल्ला करतील, याची भीती वाटते. एकदा सरकारने ही जमीन घेऊन टाकावी.
- परसराम सुरोशे, पीडित शेतकरी, जाम नाईक
माझ्या कुटुंबाची १२ एकर शेती आहे. यावेळी सोयाबीन व ज्वारी पेरली होती. रोही आणि रानडुकरांनी संपूर्ण खाऊन टाकली. शेताच्या तिन्ही बाजूनी जंगल आहे. शेतीवर कसे जगावे, हा मोठा प्रश्न आहे. शासनाने जमीन अधिग्रहित करून आम्हास मोकळे करावे.
- श्‍यामराव मासोळकर, शेतकरी, अनसिंग
शेतीत पेरलं की रोही, रानडुक्कर काहीच राहू देत नाहीत. यंदा सोयाबीन पाण्याने खरडून गेले. उरले सुरले डुकरांनी खाल्ले. त्यामुळे आता शेतमजुरीसाठी बाहेरगावी जावे लागते.
- उत्तम गुळवे, शेतकरी, गौळ मांजरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com