
Mumbai News : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत पिके करपू लागली आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पेरणी झालेली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीकरिता नोटिसा बजावण्यात येत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना पाठविण्यात येणारी बँकांची नोटीस तत्काळ थांबवून कर्जमाफी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, की १ ते १८ ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. शेतकऱ्यांची पिके हातातून गेली आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात येत आहे. शेतकरी, शेतमजूर यांच्याप्रती शिंदे-फडणवीस सरकार बोथट, भावनाशून्य झाले आहे. पीकविमा कंपन्यांनी त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खतांचा काळाबाजार झाला आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.
‘...आणि मुख्यमंत्री शेतकरीप्रश्नी बोलत नाहीत’
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री सूटबूट घालून जपानला जातात आणि मुख्यमंत्री शेतकरीप्रश्नी बोलत नाहीत, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वाली कोण आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा येत आहेत. दुबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.
त्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा एवढा जाच का, जे अजित पवार आजपर्यंत नोटीस आल्यानंतर भूमिका मांडत होते तेही आता काहीच बोलत नाहीत. सरकारने झोपेचे सोंग घेतले असेल तर त्यांना जागे करू. शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या तर रस्त्यावर उतरू,’’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.