
Amravati News : देशात पारंपरिक पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती योग्य नाही. यात सुधारणा घडवायची असेल तर शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हे लक्षात घेता कृषी मंत्रालयाच्या धर्तीवर शेतीपूरक व्यवसायाकरिता स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना या संदर्भाने त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यानुसार, देश व महाराष्ट्रातही पारंपरिक पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. कौटुंबिक गरजा, मुलांचे शिक्षण, आरोग्य तसेच ऐनवेळी उद्भविणाऱ्या अडीअडचणीकरिता पैसा जोडताना त्यांची चांगलीच दमछाक होते.
आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याचे धोरण सरकारने राबविले पाहिजे. त्याकरिता निधी आणि राज्यनिहाय वेगवेगळे पूरक उद्योग कोणते असावे याबाबतही स्पष्टता असावी. हे ठरविण्यासाठी स्वतंत्र शेतीपूरक मंत्रालयाचीच गरज असल्याचे सिद्ध होते. त्याकरिता केंद्र सरकार स्तरावरुन पुढाकार घेण्यात यावा, अशी मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
वातावरणातील बदलाचे आव्हान पारंपरिक पिके घेताना सातत्याने असते. हे लक्षात घेता शेतीला पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून पूरक व्यवसायाची जोड दिली. त्यामुळे आर्थिक ओढाताण होत नाही.
यावरूनच शेतीपूरक व्यवसायाची गरज अधोरेखित होत असल्याने डॉ. बोंडे यांना पत्र लिहिले होते. त्यांनी पुढे हा विषय केंद्रीय मंत्र्यांपर्यंत नेल्याने काहीतरी सकारात्मक होईल, अशी अपेक्षा आहे.
- रवींद्र मेटकर, प्रयोगशील शेतकरी, अंजनगावबारी, अमरावती
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.