
Jalgaon News : खानदेशात यंदा जूनमधील कमी अधिक पाऊस व रब्बी हंगाम साधण्याचे नियोजन यामुळे अनेक शेतकऱ्यांनी क्षेत्र नापेर ठेवले आहे. पेरण्या लांबल्या आहेत. तर काळ्या कसदार जमिनीत अतिपावसात गेले दोन वर्षे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, ज्वारी, मका या पिकांची अतोनात हानी झाली आहे. यामुळे यंदा खानदेशात ७५ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.
दरवर्षी धुळे, जळगाव, नंदुरबारमधील तापी, पांझरा, अनेर, सुकी नदीच्या लाभक्षेत्रातील काही शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. पीक लागवडीत खंड पडावा, जमीन सुपीकता टिकून राहावी आणि रब्बी हंगाम जोमात यावा, यासाठी अनेक शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. या नापेर क्षेत्रात ऑक्टोबरअखेर हरभरा, दादर ज्वारी या कोरडवाहू पिकांची पेरणी करतात. ही पिके जोमात येतात. शिवाय या पिकांमुळे जमीन सुपीकता वाढते, असे शेतकरी मानतात.
मोठे शेतकरी अधिकचे क्षेत्र नापेर ठेवतात. गेल्या खरीप हंगामात देखील खानदेशात सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले होते. कारण जूनमध्ये पिके मोडावी लागली होती आणि जुलैमध्ये अतिपावसाने नुकसान दिसत होते. काहींनी पिके मोडल्यानंतर संबंधित क्षेत्रात नव्याने पेरणी टाळली व पुढे रब्बीमध्ये कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारी पीक घेतले. असेच नियोजन यंदाही शेतकरी करीत आहेत. नापेर क्षेत्राची मशागत करून ठेवली आहे. तसेच पुढेही त्यात बैलजोडीने मशागत किंवा वखरणी केली जाईल.
अतिपावसात शेतात पाणी साचणार नाही, यासाठी शेतातून पाणी वाहून नेणारे मार्ग मोकळे केले आहेत. नापेर क्षेत्र यंदा ८० ते ८२ हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक नापेर क्षेत्र राहू शकते. त्यापाठोपाठ धुळ्यातील शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात क्षेत्र नापेर राहील, अशी माहिती मिळाली.
नापेर क्षेत्र (हजार हेक्टरमध्ये)
जळगाव...४८
धुळे...१८
नंदुरबार...
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.