
Ratnagiri News : तालुक्यातील मिरजोळे मधलीवाडी-वाडकरवाडी दरम्यान खालचापाट (म्हादणकी) परिसरात मोठमोठ्या भेगा जाऊन जमीन खचल्याने आतापर्यंत ६ एकरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
दरवर्षी अतिवृष्टीमुळे होणाऱ्या भुस्खलनामुळे मिरजोळेतील शेतकरी हताश झाले आहेत. अतिवृष्टीत भूस्खलनाचे संकट दरवर्षी आ वासून उभे राहते. त्यामुळे येथील शेतजमीन संकटात आली आहे.
यापूर्वी शेतजमीन सुमारे १५-२० फूट खोल खचली गेलेली आहे. दरवर्षी गावातील प्रत्येक शेतकऱ्याची जमीन नामशेष होत आहे. येथील नदीचा प्रवाह बदलल्यामुळे एका बाजूकडील शेतजमीन धोक्यात आली आहे. २००६ पूर्वीपासून येथील जमीन खचण्याचे प्रकार सुरू झाले. यामध्ये ६ शेतकऱ्यांची शेतजमीन नष्ट झाली होती.
सुरुवातीला सुमारे २ एकर परिसरातील क्षेत्र बाधित झाले होते. आतापर्यंत सुमारे ५ ते ६ एकर क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. २०१९ मध्ये पाटबंधारे विभागाने येथील भूस्खलन रोखण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव जिल्हा महसूल विभागाकडे पाठवण्यात आला.
२०१८ मधील भूस्खलनानंतर प्रशासनस्तरावरून येथील उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू केली. २०१९ मध्ये पावसाळ्यानंतर भूस्खलनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू झाली. दरवर्षी अतिवृष्टीमध्ये जमीन खचल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. यावर वेळीच प्रतिबंध न घातल्यास वस्तीपर्यंतचा भाग खचत येण्याची शक्यता आहे.
जमीन खचून पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये विनायक शिवराम भाटवडेकर, दिनेश वसंत भाटवडेकर, दत्ताराम भिकाजी गावकर, राजाराम तानू गावडे, गंगाराम माणका गावकर, रमेश तुकाराम भाटकर, भास्कर महादेव चव्हाण, मधुकर विठ्ठल गावडे, अनंत बापू पाडावे यांचा समावेश आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.