
Pune News : ‘‘खेड प्रशासन व लोक सहभागातून खेड तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागात ५०० वनराई बंधारे बांधण्याचा खेड महसूल विभागाने संकल्प केला आहे,’’ अशी माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
खेड तालुक्यात अनेक भागांत उन्ह्याळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाई निर्माण होते. तालुक्याच्या पूर्व भागात मोठी पाणीटंचाई भासते. पूर्व भागात कमी प्रमाणात, तर पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र पाणी साठविण्याची सोय नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तालुक्यात तीन धरणे असूनही तालुक्याचा पश्चिम भाग व पूर्व भाग वर्षांनुवर्षे तहानलेला आहे.
‘‘खेड तालुक्यात पावसाळ्यात मॉन्सून पावसामुळे तालुक्यात काही नद्या-नाले वाहू लागले आहेत. वाहणारे पाणी आपल्या शिवारात अडविले, तर भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.
रब्बी पिकांसाठी संरक्षित पाणी उपलब्ध होईल, या हेतूने खेड तालुक्यात प्रशासनाच्या वतीने लोकसहभागातून सुमारे ५०० वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन वनपरिमंडळ वन विभाग, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.
या वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. पुढील महिनाभर गावातील परिसरात वनराई बंधारे बांधण्यासाठी उपयुक्त वेळ आहे. या वेळेत वनराई बंधारे बांधल्यास त्यात पाणी साचून पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल, शासकीय यंत्रणा, गाव स्तरावरील यंत्रणा, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना यांच्या पुढाकारातून जलसंवर्धन चळवळीला योगदान दिले जाईल,’’ असे बेडसे म्हणाले.
...असे आहे नियोजन
‘‘वनविभागाच्या माध्यमातून २५०, खेड पंचायत समितीच्या माध्यमातून १५०. महसूल विभागाच्या वतीने १००, कृषी विभागाच्या वतीने १०० असे एकूण ५०० वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. या उपक्रमात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे,’’ असे आवाहन तहसीलदार बेडसे यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.