
रत्नागिरी ः जिल्ह्यातील ९३२.७७ हेक्टर क्षेत्र मत्स्य व्यवसायासाठी (Fishing Business) अनुकूल असतानाही केवळ ७४२.०५ हेक्टर क्षेत्रच व्यवसायाखाली आहे. गतवर्षात गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी (Fish Farming) ४२ लाख ९४ हजार रुपयांचे मत्स्य बीज वापरले गेले. त्यातून केवळ ६० लाख ८२ हजार रुपयांची मासळी मिळाली.
रत्नागिरी जिल्ह्यात तळी, सरोवरे, जलाशयांत मत्स्य व्यवसायासाठी ४१ अनुकूल क्षेत्र आहेत. ११ वर्षांपूर्वी ही क्षेत्र ४० होती. गोड्या पाण्यातून कटला, रोहू, मृगल, गीफ्ट टिलापिया, पॅग्नेसियस, रूपचंद नावाच्या मासळीचे उत्पादन मिळते. या मासळीला जिल्ह्यातून सागरी मासळीप्रमाणे मागणी नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठसुद्धा नसल्याने या भूजल मासेमारीतून मिळणारी मासळी पश्चिम महाराष्ट्रात जाते.
हा भूजल मत्स्य व्यवसाय करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच ठेकेदार आणावे लागतात. गोड्या पाण्यातील ही मासळी पकडून नेण्यासाठी संपूर्ण तयारीसह पश्चिम महाराष्ट्रातील ठेकेदार येतात आणि ती स्वस्त किमतीत मासळी पकडून पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठेत नेतात. जिल्ह्यात ११ वर्षांपूर्वी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी ४० अनुकूल क्षेत्र होती.
याचे एकूण क्षेत्र ८७५.५७ हेक्टर होते. त्यातील ६२५.७३ हेक्टर क्षेत्र या भूजल मत्स्य व्यवसायाखाली होते. त्या वेळी ४७.३५ टन उत्पादन मिळून त्यातून माशाचे उत्पादन करणाऱ्या ठेकेदारांना केवळ ९ लाख ४६ हजारांची किंमत मिळाली होती. त्याचवेळी या मत्स्य उत्पादनासाठी १७ लाख ८५ हजार रुपयांचे मत्स्य बीज वापरण्यात आले होते.
६० लाख ८२ हजारांची मासळी मिळाली
सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या २०२०-२१ च्या आकडेवारीनुसार मंडणगड तालुक्यातील गोड्या माशांच्या पैदाशीसाठी ५ लाख रुपयांचे मत्स्य बीज वापरण्यात आले. त्यातून केवळ ५ लाख २० हजार रुपयांचेच मासे मिळाले. दापोलीत ९ लाख २४ हजार रुपयांच्या मत्स्य बीजातून केवळ ९ लाख ८० हजार रुपयांची मासळी मिळाली.
खेडमध्ये ६ लाख ३० हजार रुपयांच्या मत्स्य बीजातून १५ लाख १० हजार रुपयांची मासळी मिळाली. चिपळुणात ५ लाख रुपयांच्या मत्स्यबीजातून ८ लाख ९ हजार, गुहागरात अडीच लाखांच्या मत्स्यबीजातून २ लाख ८७ हजार रुपयांची मासळी, रत्नागिरीत १ लाख २० हजार रुपयांच्या मत्स्यबीजातून ३ लाख ६ हजार रुपयांची मासळी,
संगमेश्वरात २ लाख २० हजार रुपयांच्या मत्स्यबीजातून ६ लाख २७ हजार रुपयांची मासळी, लांजात ८ लाख ९० हजार रुपयांच्या बीजातून केवळ ७ लाख ४० हजार रुपयांची मासळी आणि राजापुरातील तळी, सरोवर, जलाशयातून मासळी उत्पन्न घेण्यासाठी २ लाख ६० हजार रुपयांचे मत्स्यबीज वापरून त्यातून केवळ ३ लाख ३ हजार रुपयांची मासळी मिळाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.