
Raju Shetti Agitation : गेल्या हंगामात तुटलेल्या उसाचे ४०० रुपये कारखान्यांनी ०२ ऑक्टोबरपर्यंत न दिल्यास कारखान्यांची साखर वाहतूक अडवण्यात येईल. तसेच प्रत्येक कारखान्यांना जागे करण्यासाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ऊस उत्पादकांचा हक्काचा दर मिळवून देण्यासाठी इथून पुढे आंदोलन तीव्र करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. दोन ऑक्टोंबर नंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असेही शेट्टी यांनी संगितले.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मागील हंगामातील उसाला ४०० रुपये मिळावेत, यासह कारखान्यानी ऑनलाइन काटे बसवावेत अन्यथा त्यांना गाळप परवाने देऊ नयेत या मागणीसाठी आज बुधवारी (ता.१३) येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला त्यावेळी राजू शेट्टी बोलत होते.
शेट्टी म्हणाले की, साखर कारखान्यांना गेल्या हंगामामध्ये गाळप झालेल्या साखरेस व उपपदार्थास चांगले दर मिळाले आहेत. यामुळे साखर कारखान्यांकडे एफ. आर. पी अदा करून तोडणी वाहतूक व प्रक्रिया खर्च वजा जाता अजूनही पैसे शिल्लक राहिले आहेत. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर माळेगांव साखर कारखान्यांनी जवळपास प्रतिटन ५०० रूपयाहून अधिकचा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.
वास्तविक पाहता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हारी पुणे जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा जादा आहे. यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना दुसरा हा प्रतिटन ४०० रुपये देणे सहज शक्य आहे. हे पैसे आम्ही सोडणार नाही. इथेनॉल मधूनही कारखान्यानी फायदा मिळवला आहे. साखर व इथेनॉल विकून कारखाने फायदा मिळवत आहेत.
शेट्टी म्हणाले, भविष्यातही उसापासून तयार होणाऱ्या साखरेला व उपपदार्थाना भविष्यात तेजी असल्याचे दिसून येऊ लागले असून यामुळे कारखानदारांना यातून चांगले उत्पन्न मिळणार आहे. वाढलेली महागाई, गगनाला भिडलेले औषधे, बि बियाणे व खताचे दर यामुळे उत्पादन खर्चात बेहिशोबी वाढ झालेली आहे. यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सरकारच्या धोरणाबरोबर कारखान्याकडून ही लूट सुरू आहे.
सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे डिजीटल करावेत अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी अनेक वर्षापासून करत आहेत. मात्र सरकारने अद्यापही यावर कार्यवाही केलेली नाही. जोपर्यंत साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन व डिजीटल होत नाहीत, तोपर्यंत साखर कारखान्यास गाळप परवाना देऊ नये. या मागण्यावर तातडीने योग्य ती कार्यवाहीची या उस उत्पादक शेतकर्याच्या धडक मोर्चाची दखल घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलनाचा भडका उडेल असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.
यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, राजेंद्र गड्यानवार, राम शिंदे आदींसह कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.