
Sangli News : कोळसा टंचाई, पावसाने दिलेल्या ओढीमुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. शेतीला दिवसा सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यातील २५ उपकेंद्रांजवळ १७३ मेगावॉट वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यात दोन लाख ५३ हजार १२१ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यास मदत होणार आहे.
महावितरणकडून सौरऊर्जा वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २५ उपकेंद्रांजवळ १७३ मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट महावितरण कंपनीने ठेवले आहे. यापैकी बहुतांश सौरऊर्जेचे प्रकल्प गायरान जमिनीत उभारण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून प्रयत्न चालू आहेत.
गावातील गायरान जमिनीत सौरऊर्जेचे प्रकल्प राबविल्यानंतर सलग तीन वर्षे ग्रामपंचायतीला प्रति वर्षी पाच लाख रुपये महावितरण कंपनी देणार आहे. यातून गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना शेतीला दिवसा अखंडित वीजपुरवठा होणार आहे. योजनेतून जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणालाही चालना मिळणार आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
ग्रामपंचायतींना १५ लाखांचे अनुदान
ग्रामपंचायतींनी अधिकाधिक गायरान जमीन देण्याचे ठराव मंजूर करावेत. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होतील त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच लाख प्रतिवर्ष असे तीन वर्षांत १५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली.
शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांचे अनुदान
महावितरणला भाडेपट्टीवर देऊन नियमित उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांना मोठी संघी आहे. किमान तीन एकर जमीन महावितरण उपकेंद्रापासून चार किलोमीटर परिघात असल्यास एकरी ५० हजार रुपये म्हणजे हेक्टरी एक लाख २५ हजार रुपये वार्षिक भाडे मिळणार आहे. त्यात दरवर्षी पायाभूत वार्षिक भाडेपट्टीवर तीन टक्के वाढ होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.