
Pune News : यापुढे गावचे, गण-गटाचे, तालुक्याचे राजकारण बंद. आता फक्त पाणी हाच प्रश्न आणि पाणी हाच प्रमुख पक्ष असे म्हणत शिरूरच्या १२ दुष्काळी गावांनी एकमुखी ग्रामसभा ठराव घेतला आहे. तसेच १२ गावे पाणी संघर्ष कृती समितीला पाठिंबा दिला आहे. प्रत्येक गावातून चार-चार सदस्यही या समितीत पाठविण्याचा निर्णय झाला.
पाबळ, केंदूर, धामारी, खैरेनगर, खैरेवाडी, हिवरे, कान्हूर-मेसाई, मिडगुलवाडी, चिंचोली-शास्ताबाद, मलठणची लाखेवाडी, सोनी सांगवी व वरुडे आदी गावे गेली कित्येक वर्षे पाण्यावाचून व्याकूळ आहेत.
ठोस व कायमचा पाणीस्त्रोतच या गावांना मिळू शकलेला नसल्याने ही सर्व गावे पाणी संघर्ष कृती समितीच्या नावाने एकत्र आली आहेत. कान्हूर-मेसाई व धामारी येथील दोन बैठकांनंतर समिती ‘अॅक्टीव मोड’मध्ये आली आहे.
समितीच्या निर्णयानुसार, शुक्रवारी (ता. १५) या सर्व गावांनी विशेष ग्रामसभा घेऊन पाण्याच्या आंदोलनात थेट उतरण्याचा, संघर्ष समितीला आंदोलनांच्या निर्णयांचा, पाणी प्रश्नासाठी प्रशासकीय, राजकीय, सामाजिक बैठका घेण्याचा अधिकार दिला आहे. मोठ्या आंदोलनांसाठी संपूर्ण गावे उत्स्फूर्तपणे बंद करून आंदोलनांमध्ये उतरण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला.
विशेष म्हणजे प्रत्येक गावात ग्रामपंचायत पातळीवर आणि पक्षीय पातळीवर दोन-तीन पक्ष सक्रिय असले तरी या पुढील काळात गावचे, गण-गटाचे, पक्षांचे, तालुक्याचे राजकारण पूर्ण बंद करून केवळ पाणीप्रश्नावरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णयही या ग्रामसभांनी घेतला आहे.
...तर ४० हजार मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार
या बारा गावांमध्ये पाणी प्रश्न गंभीर आहे. पाणीप्रश्नाच्या लढाईत लवकर यश न मिळाल्यास आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याची चर्चा प्रत्येक ग्रामसभेत झाली आहे. ४० हजार मतदार सर्व निवडणुकांची गणिते बदलू शकतात, असा इशारा प्रत्येक गावाने दिला आहे, हे विशेष.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.